भाजपने आपला भविष्यात काँग्रेस होऊ नये याची तजवीज करत तरुण आणि दुढ्ढाचार्यांच्या अशा संमिश्र केंद्रीय नेमणुका केल्या आहेत. त्यात फडणवीसांना प्रशस्ती देताना गडकरींना विश्रांती दिली आहे. पण, हा काटा त्यांनी भविष्याचा विचार करून हळुवारपणे
काढला आहे!
भाजपमधील सध्याच्या घडामोडीवर बोलताना ज्ये÷ नेते अण्णासाहेब डांगे (सध्या डांगे राष्ट्रवादीत आहेत आणि अधून-मधून संघाच्या स्वातंत्र्य लढय़ातील कामगिरीवरही मत प्रदर्शित करत असतात) यांच्या काळातील एका भाजप पदाधिकाऱयाने डांगे यांच्याच भाषणशैलीत खूप चांगली गोष्ट सांगितली. ते म्हणाले, जो चालतो त्याच्याच पायात काटा रुततो. पण काटा रुतला म्हणून थांबायचे नाही, ही भाजपची रीत आहे. काटा एकदम काढता येत नाही. नाहीतर तो खोलवर जखम करतो. त्यासाठी आधी त्याला चांगल्या कापडाने बांधून रुतलेली जागा वेळ देऊन मऊ करून घ्यायची. नंतर चिमटय़ाने काटा बाजूला काढायचा आणि चालू लागल्यावरही ठणक लागलीच तर बिब्याचा चटका द्यायचा! पायाची ठणक थांबली पाहिजे आणि चालताही आलं पाहिजे! कधीकाळी अडवाणींना थांबवण्यासाठी उपयोगात आलेल्या गडकरींना पक्षाची ही रीत माहित आहे. त्यांच्यासारख्या मुरब्बी नेत्यांना पक्के माहित आहे की, आपण केंद्रीय मंडळात नसलो तरी, आपल्या मतांचा प्रभाव हा भविष्यातही पडणार आहेच. जेव्हा सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज पडेल, किंवा पाणी डोक्मयावरून वाहू लागेल तेव्हा त्याला पायापाशी आणण्यासाठी पक्ष, संघ आपल्याकडेच येणार आहे! त्यामुळे गडकरी प्रतीक्षा करतील आणि केंद्रीय मंत्रिमडळात असेपर्यंत आपला प्रभाव वाढवत राहतील! भाजपला हे पक्के माहिती आहे की, महाराष्ट्रातील उद्याचे राजकारण तरुणांच्या हातात चालले आहे. आदित्य ठाकरे, रोहित पवार, सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, रोहित पाटील असे नेतृत्व इतर पक्षात वेगाने पुढे येत असताना आपलीही तयारी असली पाहिजे. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रात युवा आमदारांची फळी बनवली आहे. ती पारंपरिक घराण्यांबरोबरच वंचित घटकातूनही आणलेली आहे. त्यांना एकत्र घेऊन जायला फडणवीसांना महाराष्ट्रातील त्यांची दहा वर्षे पूर्ण होईपर्यंत संधी आहे. यातील साडेसात वर्षे संपली आहेत. त्यामुळे त्यांना गतीने दिल्लीसाठी तयार केले जाईल आणि युवा आमदारांना मिळेल तिथे संधी देऊन पुढे आणले जाईल. म्हणजेच राज्यातील भाजप पुढची काही वर्षे फडणवीसांच्या पद्धतीनेच चालणार आहे. पण, केवळ त्यांच्या एकटय़ाच्या हाती सगळे आहे असे वाटू नये म्हणून प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे यांची नेमणूक आणि चंद्रकांतदादांना पुन्हा मंत्रीपद देऊन समतोल साधला आहे. मुंबईतील तावडे, शेलार त्यांना दिलेल्या पक्षीय कामगिरीत खुश आहेत. गडकरींनाही भविष्यात फडणवीसांना दिल्लीत बोलावले जाईल आणि तुमच्याकडील जबाबदारी कमी करताना तुमच्या मर्जीतील प्रदेशाध्यक्ष दिला जाईल हे सांगून केंद्रीय नेमणुका केल्या आहेत. परिणामी आधीच गडकरींनी फडणवीस यांच्या प्रगतीचे आणि बावनकुळे यांना असलेल्या संधीचे सूतोवाच आपल्या नागपुरातील भाषणातून केले असावे. देवेंद्र फडणवीस यांनी बिहार, गोव्यामध्ये केलेली कामगिरी, महाराष्ट्रातील सत्तांतर आणि प्रमुख पदापासून दूर ठेवण्याची भरपाई म्हणून निवडणूक समितीत त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. पण भविष्यातील निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रात लढवल्या जातील. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कदाचित तेच असतील. पण, तरीही गरज लागली तर 2024च्या निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी भाजप राखूनही ठेवू शकते! अर्थातच नागपुरातून पुन्हा गडकरीच लढणार! कदाचित ही उपराजधानी आणि सांस्कृतिक राजधानी अशी विभागणी असावी. काँग्रेसमध्ये सगळे दुढ्ढाचार्य प्रमुख पदावर बसून राहीले आणि खुद्द राहुल गांधी, ज्योतीरादित्य शिंदे, सचिन पायलट अशा युवा नेतृत्वाची गोची होऊन पक्षाची वाताहत झाली. भाजपला असे नेतृत्व तुंबवून ताज्या रक्ताचे डबके बनू द्यायचे नाही. तसे झाले तर डबक्मयातील जीव एकमेकालाच खायला उठतात!आता बघायचे भाजपचे हे म्हणणे योग्य ठरते का?
सत्तेची मोहिनी, सेनेतच सुंदोपसुंदी!
इतक्मया उलथापालथी होत असताना, भाजपच्या प्रवक्त्यांना आणि मंत्र्यांना पुरेशी उसंत मिळालेली आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिंदे गटाला गद्दार ठरवण्यात आणि विधिमंडळात त्यांच्या मंत्र्यांविरोधातच शक्ती खर्च करत आहेत. भाजप त्यातून अलगद निसटली आहे. सर्वात जास्त 65 टक्के निधी, सर्वात चांगली मंत्रिपदे आणि सर्व शक्ती आपल्याच ताब्यात अशी भाजपची महाशक्ती झालेली आहे. त्यामुळेच शिंदे गटाला विलीन करून न घेता त्यांचे महत्त्वाचे अनुयायी पुढच्या निवडणुकीपर्यंत भाजपमध्ये येतील आणि शिवसेना आहे त्या बंडखोरांशीच लढत राहील अशा पद्धतीची रणनीती भाजपने आखलेली दिसून येते. वैशिष्टय़ म्हणजे सत्तेच्या मोहिनीतून शिवसेना आणि शिंदे गटातच सुंदोपसुंदी सुरू आहे. विरोधीपक्षनेते अजितदादांना मुख्यमंत्री शिंदे यांना दिवस बदलत असतात अशी आठवण करुन द्यावी लागली. इतकी ती वाढली आहे. विरोधकांचे सगळे हल्ले केवळ बंडखोरांच्यावरच असल्याने भाजपच्या मंत्र्यांना ‘अभ्यासा’ला संधी मिळाली आहे. उर्वरित ‘कृती गट’ नवाब मलिक आणि देशमुख यांच्या पंगतीला यापुढे कोण बसेल याचे ट्विट करून आपली माहिती काढणाऱयांना दमात घेत आहे. वैशिष्टय़ म्हणजे सिंचन घोटाळा जो 2012 पासून भाजपच्या उपयोगी पडतो आहे, त्या हक्काच्या मुद्याला राष्ट्रवादी विरोधात पुन्हा एकदा मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे. कारखाने खरेदी आणि राज्य बँकेचे आरोप गत अधिवेशनात निष्प्रभ ठरले आता सिंचन घोटाळय़ाचा आरोप अजितदादा आणि तटकरेंविरोधात नव्या सत्तेत किती काळ टिकतो? ते या अधिवेशनात समजेलच. अधिवेशनाच्या निमित्ताने बच्चू कडू यांची मंत्रीपदाची खदखद दिसून आली आणि त्यांचा फोन टॉप करणाऱया महिला अधिकाऱयाने फडणवीस यांची भेट घेतली. त्याच्या दुसऱयाच दिवशी कडू यांचे बोलणे गोड गोड होऊ लागले. महाशक्तीचा हा आणखी एक प्रभाव!
शिवराज काटकर