उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विठ्ठल चरणी साकडे
प्रतिनिधी / पंढरपूर
गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱयांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम् सुफलाम् व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापूजेप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्या दोघांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.
साळुंखे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी….
शिरोडी खुर्द (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे हे दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले. त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने एक वर्ष कालावधीचा मोफत प्रवासाचा पास सुपूर्द करण्यात आला. साळुंखे समाज कल्याण कार्यालयातून सेवानिवृत्त झाले असून, ते पन्नास वर्षांपासून वारी करत आहेत.