पुणे / प्रतिनिधी :
पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत टिळक कुटुंबीयांना डावलल्यानंतर शहरात ‘कुलकर्णी, टिळकांनंतर आता नंबर बापटांचा का… ?’ असा प्रश्न विचारणारे पोस्टर्स अज्ञातांकडून लावण्यात आल्याने ब्राम्हण समाजाची नाराजी समोर आली आहे. ही पोस्टर्स राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून, भाजपविरोधात वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. टिळक कुटुंबातील व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिली नाही. यानंतर आता कसबा पोटनिवडणुकीत उमेदवरीवरून पुण्यात फ्लेक्सबाजी करण्यात आली. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठीतील विधानसभेची जागा रिक्त झाली. यानंतर भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे नाराजीचा सूर उमटला होता.
पोस्टरवर काय लिहिलंय?
या पोस्टरवर ‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला आता नंबर बापटांचा का…??? समाज कुठवर सहन करणार? कसब्यातील एक जागरूक उमेदवार’ असा मजकूर लिहण्यात आलेला आहे. हे फ्लेक्स पुणे शहरातील काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. दरम्यान हा फ्लेक्स नेमका कोणी लावला? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भाजपला फटका बसणार?
कसबा पेठ मतदारसंघात ब्राम्हण समाजाचे मताधिक्य आहे. हा भाजपचा पारंपारिक मतदार समजला जातो. यादरम्यान टिळक परिवारातील उमेदवाराला डावलल्याने भाजपला पोटनिवडणूकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.