ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटाविरोधात शिवसैनिकांचा रोष सुरु असतानाच जळगाव जिल्ह्यानं एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. राज्यात शिंदे गटाचा पहिला सरपंच होण्याचा मान जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा ग्रामपंचायतीला मिळाला आहे. माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत यमुनाबाई हिलाल ठाकरे या सरपंचपदी विराजमान झाल्या.
राज्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर जरी लढवली जात नसली तरी मात्र पक्षाच्या नेतृत्वात तयार झालेल्या पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते. त्यामुळे जळगावातील शिंदे गटाचे माजी मंत्री आमदार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात कुसुंबा ग्रामपंचायतमध्ये समर्थक पॅनेलच्या माध्यमातून सरपंचपदाच्या निवडणुकीत यमुनाबाई हिलाल ठाकरे या 17 पैकी 9 मते मिळवून सरपंचपदी विजयी झाल्या. कुसुंबा ग्रामपंचायतीवर आता शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे.
हेही वाचा : राज्य सेवा परीक्षेचा नवा अभ्यासक्रम जाहीर