सांडपाणी रस्त्यावर, स्थानिकांना समस्या
बेळगाव : इंदूनगर, यमनापूर येथे नागरी सुविधांची वानवा असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्ते, गटारी, ड्रेनेज आणि इतर सुविधा नसल्याने गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासन आपल्याकडे लक्ष देणार का? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. परिसरात गटारीअभावी सांडपाणी तुंबून आहे तर काही वेळेला रस्त्यावरच वाहत आहे. त्यामुळे रोगराईला सामोरे जावे लागत आहे. तसेच डास आणि माश्यांचा प्रादूर्भाव वाढला आहे. शिवाय रस्त्याची सोय नसल्याने स्थानिक नागरिकांना ये-जा करणे कठीण होऊन बसले आहे. विशेषत: वयोवृद्ध आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. शहरात इतर ठिकाणी रस्ते आणि गटारींचा विकास झाला असला तरी उपनगरातील अनेक भागात नागरी सुविधांची वानवा असल्याचे दिसत आहे. प्रशासनाने तातडीने नागरी सुविधा पुरवून स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.