अग्निशमन विभागाचीही परवानगी गरजेची : धोका उद्भवण्यापूर्वी यंत्रणा बसविणे आवश्यक : यंत्रणेशिवाय मोठय़ा इमारतींना परवानगी देणे नियमबाहय़
प्रतिनिधी /बेळगाव
इमारतीचे बांधकाम करताना महानगरपालिकेच्या परवानगीबरोबरच अग्निशमन विभागाचीही परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु बेळगावमध्ये सर्रास इमारतीत अग्नि प्रतिरोधक यंत्रणा नसून अग्निशमन विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता इमारतीचे बांधकाम केले जात आहे. यामुळे भविष्यात एखादा मोठा धोका उद्भवण्यापूर्वी अग्नि प्रतिरोधक यंत्रणा बसविणे आवश्यक आहे.
बेळगाव शहराचा विकास झपाटय़ाने होत आहे. त्यामुळे सर्रास 4 ते 6 मजली इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. इमारत बांधकामानंतर बिल्डर ग्राहकांकडून सर्व सेवांचे पैसे वसूल करतो. परंतु अग्निविरोधी यंत्रणा इमारतीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. खरे म्हणजे ही यंत्रणा असल्याशिवाय मोठय़ा इमारतींना परवानगी देणे हेच नियमबाहय़ आहे. बेळगावमध्ये 99 टक्के इमारती अग्निशमन विभागाकडून परवानगी न घेता उभारल्या जात आहेत.
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये जागेचा अभाव असल्याने लहान जागेत अपार्टमेंट उभी राहत आहेत. अरुंद जीने, तसेच अग्निविरोधी यंत्रणा नसल्यामुळे इमारतींमध्ये आग लागल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्मयता असते. त्यामुळे नागरिकांनीही खबरदारी घेणे तितकेच गरजेचे आहे.
काय सांगतो नियम?
इमारतीचे बांधकाम नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया-2016 च्या नियमावलीनुसार असणे आवश्यक आहे. इमारतीमध्ये आग लागल्यास पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर बसविणे गरजेचे आहे. इमारतीत जनरेटर असेल तर सीओटू यंत्रणा कार्यान्वित असावी. 3 महिन्यांतून एकदा तरी फायर ड्रील करावे, गॅस सप्लाय पाईपची वरचेवर देखरेख करावी, अशी नियमावली घालून देण्यात आली आहे.
अपघातानंतरच आठवते उपाययोजना
चार वर्षांपूर्वी बेळगावमधील एका मोठय़ा मॉलला रात्रीच्या वेळी आग लागली. मॉलमध्ये कोणत्याही प्रकारची आग विझविण्याची यंत्रणा नसल्यामुळे रात्रभर मॉलमधील साहित्य जळत होते. ही घटना जर दिवसा झाली असती तर अनेकांना जीव गमवावा लागला असता. ऑटोनगरमध्येही अशाच प्रकारे एका कारखान्याला आग लागली होती. त्यामुळे इमारती, कारखाने, हॉस्पिटल, शाळा, नागरिकांची रहदारी असणारी ठिकाणे येथे तरी आग विझविण्याची यंत्रणा असणे आवश्यक आहे. अपघात होऊन नुकसान झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे.