विदेशमंत्र्यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले ः युएनमध्ये उपस्थित केला होता काश्मीर मुद्दा
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानकडून काश्मीरसंबंधी टिप्पणी करण्यात आल्यावर भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी त्याच व्यासपीठावरून त्याला चांगलेच सुनावले आहे. जो देश ओसामा बिन लादेनचा पाहुणचार करत होता, ज्याने स्वतःच्या शेजारी देशाच्या संसदेवर हल्ला करविला, तो संयुक्त राष्ट्रसंघासारख्या शक्तिशाली व्यासपीठावरून उपदेश देण्यास पात्र नसल्याचे जयशंकर यांनी पाकिस्तानला उद्देशून म्हटले आहे.
विदेशमंत्री हे सुरक्षा परिषदेत भारताच्या अध्यक्षतेखाली दहशतवादविरोधी आणि रिफॉर्म्ड मल्टीलेटरिलजम (बहुपक्षवाद) विषयक आयोजित दोन महत्त्वाच्या बैठकांमध्ये सहभागी झाले. मल्टीलेररिजमवरील चर्चेचे अध्यक्षत्व संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी केले. यादरम्यान पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल भुट्टोंनी काश्मीर मुद्दा उपस्थित केला होता.
चीनलाही केले लक्ष्य
बिलावल यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना जयशंकर यांनी चीन तसेच पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. स्वाभाविकपणे आम्ही आता मल्टीलेटरलिज्मवर लक्ष केंद्रीत करत आहोत. प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो, परंतु एकमत तयार होत असून किमानपक्षी यात आम्ही अधिक विलंब करू नये. जग दहशतवादाच्या विरोधात संघर्ष करत असताना काही लोक दहशतवादी हल्ले घडविणाऱयांना, कट रचणाऱयांना योग्य ठरवत आहेत. दहशतवाद्यांना वाचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा गैरवापर करत असल्याचे जयशंकर यांनी चीन अन् पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता म्हटले आहे.
गांधींची मूल्येही आजही प्रासंगिक
जग युद्ध अणि हिंसेच्या काळातून जात असून संघर्ष करत आहे. शांतता प्रसथापित करण्यासाठी महात्मा गांधींची मूल्ये आजही आवश्यक आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाची प्रतिष्ठा आता महामारी, हवामान बदल, वाद तसेच दहशतवाद यासारख्या आव्हानांवर प्रभावी उपाययोजना करण्यावर निर्भर असल्याचे उद्गार जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघ कार्यालयात गांधींच्या पुतळय़ाचे अनावरण केल्यावर काढले आहेत.
आव्हानांकडे दुर्लक्ष नको
आम्ही मार्गांचा शोध घेत असताना जगासमोरील धोक्यांकडे दुर्लक्ष करविण्याचे प्रयत्न मान्य केले जाऊ नयेत. जी गोष्ट पूर्ण जग स्वीकारत नाही, त्याला न्यायोचित ठरविण्याचा प्रयत्न काय होतोय असा प्रश्न उपस्थित होणे गरजेचे आहे. सीमापार दहशतवादाला बळ पुरविणाऱयांना आरोपीच्या पिंजऱयात उभे करण्यात यावे असे विदेशमंत्र्यांनी म्हटले आहे.
बहुपक्षीय व्यवस्था
75 वर्षांपेक्षा पूर्वी तयार करण्यात आलेल्या बहुपक्षीय संस्थांच्या प्रभावीपणाबद्दल बोलण्यासाठी आम्ही बैठक बोलाविली आहे. या बहुपक्षीय व्यवस्थेत कशाप्रकारे सुधारणा केली जाऊ शकते हा आमच्यासमोरील प्रश्न आहे. अलिकडच्या वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय यंत्रणेवरील वाढत्या तणावामुळे बदलाच्या मागणीला जोर मिळाला आहे. हवामान बदल रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी आश्वासक नसल्याचे स्पष्ट आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आवश्यक मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी आमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असतो असे जयशंकर म्हणाले.
बिलावल यांचे विधान
भारताला सुरक्षा परिषदेचा कायमस्वरुपी सदस्य करण्याच्या मागणीवर चर्चा सुरू असताना बिलावल भुट्टो यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केला होता. काश्मीरचा मुद्दा अद्याप निकाली निघालेला नाही. बहुपक्षवादाचे यश पाहण्याची इच्छा असल्यास काश्मीर मुद्दय़ावर युएनएससीचा प्रस्ताव लागू करण्याची अनुमती भारत देऊ शकतो. भारताच्या अध्यक्षतेखाली युएनएससी भारतीय उपखंडात शांतता प्रस्थापित करू शकतो हे भारताने सिद्ध करावे असे बिलावल यांनी म्हटले होते.