उत्तर प्रदेश/प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेल्यामुळे सोमवारी देशभरात तीव्र पडसाद उमटले. शेतकऱ्यांसह विरोधक आक्रमक झाले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे पुत्र आशिष यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून निवृत्त न्यायाधीशांमार्फत हिंसाचाराच्या चौकशीची घोषणा केली. मात्र, प्रियांका गांधी आणि नेत्यांना मृतांच्या कुटुंबियांना भेटण्यापासून रोखण्यात आल्याने विरोधकांनी भाजप सरकारला लक्ष्य केले. प्रियांका गांधी गेल्या २८ तासापासून पोलिसांच्या ताब्यात आहे.
दरम्यान प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केला आहे. “नरेंद्र मोदीजी तुमच्या सरकारने कोणत्याही आदेश किंवा एफआयआरशिवाय मला गेल्या २८ तासांपासून ताब्यात ठेवलं आहे. अन्नदाताला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही. का?,” अशी विचारणा प्रियंका गांधी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी ट्वीटमध्ये त्या दिवशी झालेल्या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.
लखीमपूर खेरी येथे रविवारी आंदोलक शेतकऱ्यांच्या जमावात मोटारी घुसवल्याने घडलेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. या मृतांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रविवारी रात्री काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी लखीमपूर खेरीकडे जात असताना त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी सीतापूर येथे रोखले. यावेळी प्रियांका गांधी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. अखेर पोलिसांनी प्रियांका गांधींना ताब्यात घेतले. त्याविरोधात प्रियांका यांनी उपोषण सुरू केले.