राजीनामा दिल्याच्या वृत्ताचा केला इन्कार, आज महत्त्वाची बैठक
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
बिहारमध्ये सत्तेवर असणाऱ्या संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालनसिंग यांनी आपल्या राजीनाम्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. आपल्या राजीनाम्याचे वृत्त केवळ वृत्तपत्रे आणि टीव्ही वाहिन्यांनी पसरवले. आपण केव्हाही पदाचा राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे तो स्वीकारला जाण्याचा किंवा नाकारला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिल्लीत गुरुवारी केली. दिल्लीत आज शुक्रवारी संजदची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीचे धोरण ठरण्याची शक्यता आहे. यासाठी या पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते दिल्लीत आले आहेत. पक्षाने लोकसभा निवडणुकीत कोणत्या राज्यात किती जागा लढवायच्या आणि विरोधी पक्षांच्या आघाडीसंबंधी कोणते धोरण असावयास हवे, यासंबंधीचे निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
1 तास गुप्त बैठक
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही दिल्लीत आले आहेत. त्यांनी गुरुवारी संजदच्या राज्यशाखेची बैठक आयोजित केली होती. त्याआधी त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालनसिंग यांच्याशी तासभर गुप्त बैठक केली. या बैठकीतही लोकसभा निवडणुकीसंबंधी चर्चा करण्यात आल्याचे वृत्त आहे. तथापि, ही एक सामान्य चर्चा होती, असा दावा नंतर नितीश कुमार यांनी केला आहे.
गैरसमज दूर
नितीश कुमार यांच्याशी चर्चा केल्यानंतर पक्षातील सर्व गैरसमज दूर झाले आहेत. आता कोणतेही गोंधळाचे वातावरण नाही. पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सज्ज करण्यासाठी दिल्लीत चर्चा होत आहे. शुक्रवारची बैठकही याच कारणासाठी आयोजित करण्यात आली आहे. संजदमध्ये गोंधळ असल्याची वृत्ते केवळ वृत्तपत्रांनी पसरविली आहेत, असा दावा पक्षाच्या अधिकाऱ्यांनी केला.
पुन्हा पोस्टर्स झळकली
लालनसिंग संजदच्या अध्यक्षपदी कायम राहणार, हे निश्चित झाल्यानंतर दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयाच्या परिसरात पुन्हा लालनसिंग यांची पोस्टर्स झळकू लागली आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांचे छयाचित्र असलेली भित्तीपत्रके लावण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत होते. गुरुवारी सकाळपर्यंत ते पक्षाच्या पोस्टर्सवरुन गायब होते. तथापि, संध्याकाळी पुन्हा परिस्थितीत परिवर्तन झाल्याचे दिसत होते.
आजच्या बैठकीत काय घडणार?
संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज शुक्रवारी होणार आहे. या बैठकीची तयारी करण्यात आली आहे. कार्यकारिणीचे सर्व सदस्य जमा झाले आहेत. आता पक्षासमोर लोकसभा निवडणुकीचे ध्येय आहे. या निवडणुकीसाठी कोणते डावपेच आखावेत याचा विचार शुक्रवारच्या बैठकीत केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. उमेदवारांचे निर्धारण, प्रचार पद्धती, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय आदी सर्व मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
नितीश कुमारांनी प्रश्न टाळला
पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी हातमिळवणी करणार का, असा प्रश्न नितीश कुमार यांना ते दिल्लीत आल्यानंतर पत्रकारांनी केला होता. मात्र, त्यांनी या प्रश्नाचे सकारात्मक किंवा नकारात्मक उत्तर दिले नाही. त्यांनी तो प्रश्न टाळल्याचेच दिसून आले. त्यामुळे, पुन्हा एकदा त्यांच्या मनात नेमके काय आहे, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. तथापि, पुन्हा ते भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करण्याची शक्यता कमी आहे, असेच वातावरण सध्या आहे. त्यामुळे शुक्रवारची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.