कोकणातील बस शिनोळी फाटय़ापर्यंत, प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट आणि सोलापूर जिल्हय़ांवर दावा केला आहे. त्यामुळे सीमाप्रश्न पुन्हा चिघळला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी शुक्रवारी बसवर ‘जय महाराष्ट्र’ असा मजकूर लिहून निषेध केला गेला आहे. त्यामुळे बस व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. शनिवारी दुसऱया दिवशी महाराष्ट्रातून बेळगावात एकही बस आली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेऊन इच्छितस्थळी पोहोचावे लागत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या एका विधानामुळे बससेवेवर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटक धावणारी लालपरी ठप्प झाली आहे. तर कर्नाटकची बससेवा देखील भीतीच्या छायेखालीच महाराष्ट्रात धावत आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रातील विविध भागात निषेध नोंदविला गेला आहे. तसेच कर्नाटकाच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणावाची परिस्थिती दिसून येत आहे. विशेषतः बससेवेवर याचा परिणाम झाला आहे.
बेळगावातून दररोज महाराष्ट्रात 300 हून अधिक बस धावतात. त्यामुळे चांगला महसूल प्राप्त होतो. मात्र मागील दोन दिवसांत बसफेऱया कमी झाल्याने महसुलावर देखील पाणी पडले आहे. कोरोनामुळेही मोठा फटका बसला आहे. मागील काही दिवसांपासून बससेवा सुरळीत होत असतानाच पुन्हा एकदा बससेवेवर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातून बेळगावात येणारी लालपरी ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. प्रवाशांना सीमाहद्दीपर्यंत खासगी वाहनाने प्रवास करून तेथून पुढे महाराष्ट्राच्या बसने प्रवास करण्याची वेळ आली आहे.
शिनोळी फाटय़ापर्यंत धावतात बस
महाराष्ट्राची लालपरी शिनोळी फाटय़ापर्यंत येऊन परत जात आहे. त्यामुळे प्रवाशांना शिनोळीपर्यंत खासगी वाहनाने प्रवास करून तेथून पुढे बसने प्रवास करावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कणकवली, दोडामार्ग आदी बस सीमाहद्दीतील शिनोळीपर्यंतच धावत आहेत. त्यामुळे तेथून पुढे बेळगावला येण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.