राजद अध्यक्षांच्या ‘तुझी पत्नी’च्या वक्तव्यावर राय यांचे प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ पाटणा
राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या ‘…तर काय त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री करायचे होते का’ या वक्तव्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि भाजप नेते नित्यानंद राय यांनी बुधवारी प्रत्युत्तर दिले आहे. लालूप्रसाद यादव हे जेव्हा तुरुंगात जात होते तेव्हा त्यांनी स्वत:च्या पत्नीला मुख्यमंत्री करण्याऐवजी यादव समुदायातील अन्य सक्षम नेत्याला बिहारचे मुख्यमंत्री करणे योग्य ठरले असते. त्यांनी स्वत:च्या पत्नीची निवड घराणेशाहीच्या राजकारणामुळेच केली होती असा आरोप राय यांनी केला आहे.
माझी पत्नी राजकारणात नाही. आम्ही घराणेशाहीच्या राजकारणात विश्वास ठेवत नाही. लालू यादव यांचा पूर्ण परिवार राजकारणात आहे. लालूप्रसाद हे जर घराणेशाहीचे राजकारण करत नसतील तर त्यांनी तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रिपदावरून हटवत स्वत:च्या पक्षातील अन्य नेत्याला उपमुख्यमंत्री करावे असे आव्हान नित्यानंद राय यांनी दिले आहे.
..तर माझ्या वडिलांनी सोडले होते पद
जेव्हा मी आमदार झालो होतो, तेव्हा माझे वडिल सरपंच होते. परंतु मी निवडून येताच त्यांनी सरपंचपद सोडून दिले होते. उपसरपंचाला त्यांनी सरपंच केले होते. एका कुटुंबात दोन व्यक्ती पदावर असणे चुकीचे ठरेल असे त्यांचे म्हणणे होते. तर दुसरीकडे लालूप्रसाद यादव हे घराणेशाहीच्या राजकारणाचे टोक गाठत आहेत. स्वत:नंतर पत्नी, पत्नीनंतर मुलगा, मुलानंतर दुसरा मुलगा आणि मग मुलगी आणि भविष्यात कुणा-कुणाला पुढे करतील याचा नेम नाही अशी टीका राय यांनी लालूप्रसाद यांच्यावर केली आहे.
लालूप्रसाद यांना आवाहन
तेजस्वी यादव यांना हटवून यादव समुदायातील अन्य नेत्याला उपमुख्यमंत्री करण्याचे आवाहन मी लालूप्रसाद यादव यांना करत आहे. लोकशाहीत घराणेशाही चालणार नाही. मी घराणेशाहीचे राजकारण करत नाही. माझ्या कुटुंबातील मी एकटाच राजकारणात असल्याचे उद्गार भाजप नेत्याने काढले आहेत.