प्रतिनिधी/ सातारा
राजपथावरील फुटपाथवर उभारण्यात आलेल्या या दिपमालेचे उद्घाटन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत करण्यात आले. यावेळी मोतीचौक येथील परिसरातील पथदिव्यासमोर श्रीफळ वाढवून या लामण दिव्यांचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे शहर प्रकाशमय झाले असून सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे.
याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, माजी नगरसेवक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. आकर्षक अशा या लामण दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण राजपथ मार्गच उजळून गेला होता. रात्रीच्या सुमारास या दिव्यांच्या रोषणाईने येथील सौंदर्य आणखीनच खुलुन आले होते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुकडे अशा प्रकारचे दिवे लागल्याने संपूर्ण रस्ता प्रकाशमय झाला होता.
मागील अनेक महिन्यांपासुन पालिकेच्यावतीने हे पथदिवे राजपथ मार्गावर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. याच्या भूमीगत विद्युत जोडणीचे कामकाज काही प्रमाणात बाकी होते. पण कर्मचाऱयांनी दि. 15 ऑगस्ट पूर्वी हे कामकाज पूर्ण केले आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून या लामण दिव्यांचे उद्घाटन करण्यात आले.
रस्ते झाले प्रकाशमय
देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाने तीन दिवस ‘हर घर तिरंगा’ उपक्रमा राबवला असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बरेच वर्षे शहरातील पथदिवे सुध्दा बंद अवस्थेत होते, मात्र वेळोवेळी पालिकेकडे पथदिवे सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन सदर दिवे सुरु केले आहे. मात्र स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील राजपथ मार्गावरील लामण दिवे सुरु केल्याने राजपथ मार्ग उजाळून निघाला आहे.