केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
शिरोली (कोल्हापूर) ते अंकली (सांगली) राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन करुन नवीन डीपीआर मंजूर करावा, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली.
दिल्ली येथे खासदार माने यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे ही मागणी केली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिरोली ते अंकली आणि सांगली जिह्यातील पेठ नाका ते सांगली या दोन रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे दोन्ही रस्ते कामांची तातडीने सुरुवात करावी अशी मागणी खासदार माने यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे केली.
यावर मंत्री गडकरी यांनी शिरोली पासून अंकलीपर्यंत रस्त्याचे भूसंपादन तात्काळ केले जाईल, तसेच या मार्गावरील तात्पुरती दुरुस्ती करून वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावू, तसेच आष्टा-सांगली रस्त्याला काँक्रीट करण्यासाठी प्राधान्याने काम करू असे आश्वासन दिले.
राष्ट्रीय महामार्ग क्र . 166 कोल्हापूर ( शिरोली ) ते सांगली ( अंकली ) पर्यंतच्या रस्त्याच्या चारपदरीकरण करणे कामाचे अंदाजपत्रक तयार करणेसाठी डीपीआर एजन्सी नेमली होती. या एजन्सीने काम पुर्ण करुन जमिन भूसंपादन प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी फेब्रुवारी 2022 मध्ये पाठविले आहे. मात्र राष्ट्रीय हायवे अथॉरिटी ने अद्याप मान्यता दिले नसल्यामुळे भूसंपादनचे काम सुरु झालेले नाही. तरी भूसंपादनचे काम तात्काळ सुरु करण्याच्या सुचना द्याव्यात. या रस्त्यावरती खड्डे पडले असून हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. खराब रस्त्यामुळे अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत. तरी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सुचना दयाव्यात, असे खासदार माने यांनी पत्रात म्हटले आहे.
इस्लामपूर-सांगली चौपदरीकरणाचा 945 कोटीचा प्रस्ताव मंजूर करावा
राष्ट्रीय महामार्ग क्र . 166 पेठ नाका इस्लामपूर, आष्टा ते सांगली हा रस्ता अंत्यत खराब झाला असून तो चौपदरीकरण करीत असताना काँक्रीटीकरण करणे गरजेचे आहे. त्यानुसार या रस्त्याच्या कामासाठी 945 कोटी रुपयांचा प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी सादर केला आहे. तरी त्वरीत मंजूर करुन रस्त्याचे काम सुरु करावे. तसेच पेठनाका शिराळा कोकरूड मलकापूर या 54 किलोमीटर लांबीच्या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण कराव, अशीही मागणी खासदार माने यांनी पत्राद्वारे केली.