तीन जेसीबींनी चार तासात पाडले घर ः 10 हजार सुरक्षा जवान तैनात
लखनौ / वृत्तसंस्था
गेल्या तीन-चार दिवसांपासून उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या हिंसाचारानंतर आता ‘बुलडोझर कारवाई’ हाती घेण्यात आली आहे. प्रयागराज हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार जावेदचे घर रविवारी जमीनदोस्त करण्यात आले. तीन जेसींबींनी सुमारे चार तासात इमारत भुईसपाट केली. या कारवाईदरम्यान एक किलोमीटरच्या परिघात दहा हजार पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. प्रयागराज हिंसाचारानंतर आतापर्यंत 304 जणांना अटक करण्यात आली आहे. आता आणखी 36 जणांच्या घरांवर बुलडोझर चालणार आहे.
नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर शुक्रवारी प्रयागराजमध्ये प्रचंड गोंधळ झाला. या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार जावेद पंपाच्या घरावर योगी सरकारने बुलडोझर कारवाई केली. याचदरम्यान या कटाची लिंक जेएनयूशीही जोडली जात आहे. जावेद पंपाची मुलगी जेएनयूमध्ये शिक्षण घेत असल्याची बाबत समोर आल्यानंतर पोलिसांनी अधिक सखोलपणे तपासाला प्रारंभ केला आहे. विशेष म्हणजे सीएएविरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान जेएनयूची भूमिका समोर आली होती.
कानपूरच्या बीकनगंज भागात 3 जून रोजी हिंसाचार झाला होता. त्यानंतर हळूहळू राज्यात अन्य शहरांमध्येही हिंसाचाराचे पडसाद उमटले होते. शुक्रवार-शनिवार या गेल्या दोन दिवसात आंदोलन अधिक तीव्र झाल्यानंतर प्रशासनाकडून हिंसाचार घडवणाऱयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. कानपूर विकास प्राधिकरणाने रविवारी हिंसाचारग्रस्त भागात संबंधितांवर कारवाई मोहीम सुरू केली.
कारवाईसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था
पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त ठेवला होता. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकाही तैनात केल्या होत्या. सुरक्षेसाठी सुमारे 10 हजार पोलिसांची डय़ुटी लावण्यात आली होती. हिंसाचाराच्या ठिकाणापासून मुख्य सूत्रधार जावेदच्या घराचे अंतर सुमारे 10 किलोमीटर आहे. पोलिसांना घरात झेंडे असलेल्या काही काठय़ा सापडल्या आहेत.
हल्लेखोर घर सोडून पसार
दंगल करणाऱया 70 जणांची ओळख पटल्याची माहिती प्रयागराज पोलिसांनी दिली. त्यांच्यावर 29 कलमे लावण्यात आली आहेत. आतापर्यंत 68 गुन्हेगारांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी नैनी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. यामध्ये चार अल्पवयीनांचा समावेश असून त्यांना बालनिरीक्षण गृहात पाठवण्यात आले आहे. मीडिया आणि जनतेकडून मिळालेल्या व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस सध्या हिंसाचार करणाऱयांचा शोध घेत आहेत. संशयितांच्या धरपकडीसाठी अटाला, कारली व इतर लगतच्या भागात पोलीस सातत्याने छापे टाकत आहेत. मात्र बहुतांशजण घर सोडून पळून गेले आहेत. धरपकड कारवाईमुळे संपूर्ण अटाळा परिसरात शांतता आहे.