पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या इंटरनेट सेवेचा प्रारंभ ः राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनची माहिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात ऑक्टोबर महिन्यापासून इंटरनेट सेवा सुसाट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबर रोजी 5-जी सेवा सुरू करणार आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने ट्विट करून ही माहिती दिली. देशात डिजिटल परिवर्तन घडवण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर नेण्यासाठी पंतप्रधान मोदी 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये 5-जी सेवा लॉन्च करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. ‘5-जी’मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 दरम्यान 36.4 ट्रिलियन रुपये (सुमारे 455 अब्ज डॉलर) फायदा होण्याची शक्मयता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून देशात ‘5-जी’ मोबाईल सेवेची प्रतीक्षा होती. देशवासियांची प्रतीक्षा आता संपण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ही सेवा सुरू करणार आहेत. दिल्लीतील प्रगती मैदानावर इंडिया मोबाईल काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर 5-जी सेवेबाबत अमेरिकेतील विमान वाहतुकीच्या मुद्यावरील शंकाही दूर झाल्या आहेत. या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर, दूरसंचार मंत्रालयाने एक निवेदन जारी केले असून यासंदर्भात देशात कोणतीही अडचण येणार नाही. या समस्येबाबत आयआयटी मद्रासमध्ये अभ्यास करण्यात आला. आयआयटीच्या अभ्यासानुसार, गॅपिंगमुळे अमेरिकेत निर्माण झालेली समस्या भारतात उद्भवणार नसल्याचे सांगण्यात आले.
होलोग्राम क्रांती
5-जी सेवा सुरू झाल्यानंतर ऑनलाईन-इंटरनेट जगतात ही नवी क्रांती ठरणार आहे. होलोग्रामच्या माध्यमातून दूरदूरच्या भागात शिक्षण, आरोग्य आणि आपत्कालीन सेवांमध्ये मोठा बदल दिसून येईल. दूरदूरच्या भागातील कार्यक्रमांसह विविध योजनांची माहिती असो किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो, यातून संपर्क आणि माहितीची देवाणघेवाण सहज करता येणार आहे.
ऑगस्ट महिन्यात 5-जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला होता. त्यावेळी केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5-जी सेवा सुरू होईल, अशी माहिती दिली होती. मात्र, आता ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभापासूनच भारतामध्ये 5-जी इंटरनेट सेवा उपलब्ध होणार असल्याने मोबाईल-इंटरनेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
5-जी तंत्रज्ञानाचा भारताला फायदा
भारत सरकारने अल्पावधीत देशात 5-जी इंटरनेट सेवांचे 80 टक्के कव्हरेज करण्याचे लक्ष्य ठेवल्याचे केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवडय़ात सांगितले होते. तज्ञांच्या मते, 5-जी तंत्रज्ञानाचा भारताला खूप फायदा होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठय़ा प्रमाणात फायदा होण्याची शक्मयता आहे.