कोल्हापूर /प्रतिनिधी
जिल्हयात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत असून शुक्रवारी जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत स्वच्छतेची शपथ घेवून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान फलकाचे अनावरण करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ फलकाचे अनावरण करून शुभारंभ केला. यावेळी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक, प्रियदर्शिनी मोरे यांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ दिली.
यावर्षी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात गावांची ‘ दृश्यमान स्वच्छता’ (नजरेला दिसेल अशी स्वच्छता) या संकल्पनेवर आधारित गावा-गावांमध्ये स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. वापरा आणि फेका या सवयीमुळे कच-याचे प्रश्न निर्माण झाले असून प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छतेचे भान ठेवून आपल्या वर्तनामध्ये बदल केले पाहीजे असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले. या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, महिला बाळ कल्याण अधिकारी शिल्पा पाटील,बांधकामचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत ग्राम पंचायत करनूर, ता. कागल येथे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महाश्रमदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महाश्रमदान कार्यक्रमामध्ये स्वच्छतेचे जनजागृती उपक्रम, स्वच्छता फेरी तसेच स्वच्छतेची शपथ असे विविध उपक्रम घेणेत आले. यावेळी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे,गटविकास अधिकारी सुशील संसारे, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून स्वच्छतेसाठी श्रमदान केले.