रस्ता ओलांडणे जीवघेणे ; पादचाऱयांची सुरक्षितता रामभरोसे : दुभाजकांची उंचीही ठरतेय धोकादायक
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरात वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. अवजड वाहनांमुळे शाळकरी मुले व नागरिकांचा बळी जात आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या काही अपघातांनंतर पोलीस दलाविरुद्ध नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी स्मार्ट सिटीत पादचाऱयांचा विचार कोणालाच नाही. पादचाऱयांनी सुरक्षितपणे कसे चालावे, यासाठी व्यवस्थाच नसल्यामुळे हा मुद्दा ठळक चर्चेत आला आहे.
दिवसेंदिवस बेळगावचा विस्तार वाढतो आहे. त्यामुळे साहजिकच वाहनांची वर्दळही वाढते आहे. बेंगळूर, मुंबईसह अनेक महानगरात वॉकर प्रेंडली व्यवस्था असते. बेळगाव येथे मात्र पादचाऱयांचा विचारच होत नाही, असे चित्र पहायला मिळते. जशी वॉकर प्रेंडली व्यवस्था नाही, तशीच व्हेईकल प्रेंडली पोलीस यंत्रणाही नाही, हे वारंवार अधोरेखित होत आहे.
सिग्नल व्यवस्था आहे, मात्र ती कधी बंद असते तर कधी सुरू असते. अवजड वाहनांचा मुद्दा अधूनमधून चर्चेत येतो. पाच वर्षांपूर्वी सकाळी व संध्याकाळी अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी केल्याचा आदेश प्रशासनाने बजावला होता. या आदेशाचे पालन केले जात नाही. अवजड वाहनांमुळे गेल्या पंधरवडय़ात अनेक अपघात घडले आहेत.
1 ऑगस्ट रोजी भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून सादिया पाळेगार (वय 16) मूळची राहणार कुडची, ता. रायबाग व सध्या राहणार अशोकनगर या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. फोर्ट रोडवर झालेल्या अपघातात तिची मामी जखमी झाली. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी कॅम्प परिसरात रस्ता ओलांडण्यासाठी कडेला थांबलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकची धडक बसली. या अपघातात अरहान बेपारी (वय 10) रा. कॅम्प हा विद्यार्थी जागीच ठार झाला. त्याची बहीण हप्सा (वय 18), आणखी एक विद्यार्थी आयुष आजरेकर (वय 12) रा. भाग्यनगर हा जखमी झाला. त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी पंतनगरजवळ भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसली. या अपघातात सोमनाथ खवाशी (वय 22), विठ्ठल ढवळी (वय 22) दोघेही राहणार सुळेभावी या जीवलग मित्रांचा मृत्यू झाला. अवजड वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. कॅम्प येथील अपघातानंतर फिश मार्केटपासून घटनास्थळापर्यंत गतिरोधक बसविण्यात आले आहेत. या घटनांवरून अवजड वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्मयात येत आहे, हे लक्षात येते.
पादचाऱयांची अवस्थाही अशीच आहे. रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱयांना झेब्रा क्रॉसिंगची गरज असते. याचे पट्टे काही ठिकाणी आहेत तर काही ठिकाणी गायब झाले आहेत. केवळ एखाद्या अपघातानंतर गतिरोधक बसविले म्हणजे पोलीस आणि प्रशासनाची जबाबदारी संपली, असे होत नाही. सध्या अशा तात्पुरत्या मलमपट्टीवरच प्रशासनाचा भर आहे.
वाहनांच्या वर्दळीत पादचाऱयाचा विचारच कोणी करत नाही. खरेतर पादचाऱयाला रस्ता ओलांडण्यासाठी किंवा रस्त्याशेजारी चालत जाण्यासाठी पहिले प्राधान्य दिले गेले पाहिजे. बेळगावात मात्र वेगळे चित्र आहे. ट्रक, कार, दुचाकीनंतर पादचाऱयाचा विचार होतो. रोज हजारो नागरिक रस्ता ओलांडत असतात. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी त्यांनी स्वतःच घेतली पाहिजे, असे सध्याचे चित्र आहे.
पादचाऱयांनी कसा रस्ता ओलांडावा? रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचाच वापर का करायचा? एखाद्या सिग्नलवर कशा पद्धतीने रस्ता पार करायचा? याविषयीची जागृती नसल्यामुळे सिग्नल पडल्यानंतर पादचारीही रस्ता ओलांडण्यासाठी घाई करतात. सिग्नलचा अवधी कमी असतो. त्यामुळे वाहनचालकाला तेथून निघण्याची घाई असते. अशातच पादचारी आडवे आले तर दोघांचीही गैरसोय होते.
सगळीकडे रस्त्यांवर दीड ते दोन फूट उंचीचे दुभाजक घालण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी पादचाऱयांना जाण्यासाठी व्यवस्था नाही, त्या परिसरात त्यांना दुभाजक ओलांडण्याची कसरत करावी लागते. याचे योग्य नियोजन करण्यात आले नाही. याचा फटका विद्यार्थी, वृद्ध, महिला व रुग्णांना बसतो. पोलीस, महानगरपालिका, स्मार्ट सिटी व जिल्हा प्रशासन ज्या योजना बनवितात, त्या योजनांत पादचारी कुठून जाणार, त्याच्या सुरक्षिततेचे काय? याचा विचारच होत नाही, असे दिसून येते. स्मार्ट सिटीत पादचाऱयांना सुरक्षित वाटेल, अशी परिस्थिती निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी प्रशासन पावले उचलणार का?
यासंबंधी वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा यांच्याशी संपर्क साधला असता पादचारी व वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. शहरात 22 सिग्नल्स आहेत. यापैकी काही आम्हीच बंद ठेवले आहेत तर काही बंद पडले आहेत. सिग्नलवर पादचाऱयांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था आहे. काही ठिकाणी हे पट्टे पुसले गेले आहेत. स्मार्ट सिटी व महानगरपालिकेच्या आपण संपर्कात आहोत, असे त्यांनी सांगितले.
गोव्याच्या धर्तीवर अंमलबजावणी आवश्यक
गोव्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांबरोबरच नागरिकांचाही सहभाग असतो. हाच प्रयोग बेळगावातही का करू नये? सध्याचे रस्ते, वाहनांचा सुसाट वेग, प्रशासनाचा ढिसाळपणा, दिशादर्शक फलकांचा अभाव आदींमुळे पादचाऱयांची गोची होते. सिग्नल पडल्यानंतर रस्ता कसा ओलांडायचा, या विचारात त्यांची धांदल सुरू होते. या धांदलीतून बारीकसारीक अपघात घडतात. अशा अप्रिय घटना घडू नयेत, यासाठी गोव्याप्रमाणेच नागरिकांच्या सहभागातून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. यासाठी पोलीस दलाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
रेल्वेगेट उघडल्यानंतरही कोंडी
रेल्वेगेटवरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी तीन उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे. सध्या पहिल्या व दुसऱया रेल्वेगेटवर रेल्वे आल्यानंतर फाटक बंद करण्याचीच पद्धत आहे. त्यामुळे रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागतात. रेल्वेगेटवरही पादचाऱयांनी कसे जायचे, याविषयीची व्यवस्था अस्तित्वात नाही. रेल्वेचे फाटक उघडल्यानंतर दोन्ही बाजूने घुसणारी वाहने, वाहनचालकांची गडबड, त्यामुळे होणारी कोंडी यातच पादचाऱयाला मार्ग शोधावा लागतो. रेल्वेगेटजवळही पादचाऱयांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.