मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांचा दावा
वृत्तसंस्था/ अयोध्या
श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिराच्या बांधकामाबाबत मोठे वक्तव्य करत मोठा खुलासा केला आहे. पहिल्याच पावसात छताला गळती लागल्याचे सांगत त्यांनी बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. रामलल्ला विराजित असलेल्या आसनाजवळच पहिल्या पावसात पाणी टपकत असल्यामुळे याची चौकशी व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आता मंदिर पहिलाच पावसाळा होत असून छतावरून पाणी गळू लागल्याचे राम मंदिराचे मुख्य पुजारी सांगत आहेत. या मंदिराच्या बांधकामाला अद्याप एक वर्षही उलटले नसल्यामुळे चौकशीची मागणीही त्यांनी केली.