मोठ्या प्रमाणात पाणी वाया, पाणीपुरवठा ठप्प
प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ परिसरात ड्रेनेजवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या ड्रेनेजवाहिन्या घालताना जलवाहिन्यांची मोडतोड होत आहे. मोडतोड झालेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करून खोदलेल्या चरी बुजविल्या. मात्र पाण्याचा दाब वाढल्याने मंगळवारी रात्री मारुती गल्लीतील जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. तसेच पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
ड्रेनेजवाहिन्या घालण्यासाठी मोठमोठ्या चरी खोदण्यात येत आहेत. खोदाई करताना नळजोडण्या तसेच जलवाहिनीची मोडतोड होत आहे. जलवाहिन्यांची मोडतोड झाल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होत आहे. 10 ते 15 फूट खोल चरी खोदून ड्रेनेजवाहिन्या घालण्यात येत आहेत. पण हे काम संथगतीने सुरू असल्याने रहिवाशांना धोकादायक बनले आहे.
खोदलेल्या चरीमुळे मुख्य जलवाहिनीचेही नुकसान झाले आहे. चरी बुजविण्यापूर्वी नळजोडण्या आणि जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली. पण मंगळवारी रात्री पाणीपुरवठा करण्यात आल्यानंतर पाण्याचा दाब वाढल्याने जलवाहिनी फुटली आहे. या परिसरात 24 तास पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने रात्रभर पाणी वाया गेले आहे. बुधवारी सकाळी एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविल्यानंतर पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तसेच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. पण सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नव्हते.