(उत्तरार्ध)
भारद्वाज मात्र सगळ्यांना आश्वासन दिल्यासारखा प्रत्येक मतदाराच्या अंगणात जाऊन ‘हो हो हो हो’ असा आवाज सांगत फिरत असतो. त्याला मात्र ‘हो’ हाच स्वर मिळाला.
आता राहिली टिटवी. रात्री ओरडत जाणाऱ्या टिटवीला सगळ्यांची झोप मोडायची असते. उगीचच वात्रट मुलांसारखी बाईक वाजवत जाणाऱ्यांसारखी टिटवी टीटॅव, टिटॅव म्हणते… म्हणजेच उठा उठा झोपलात काय? असं म्हणत ओरडत जाते. अशा वेळेला रात्री नको त्यांना जाग येते आणि बाकीचे मात्र झोपून राहतात. त्या दिवसापासून टिटवीला ‘ट’ हे अक्षर मिळालं.
पोपटाला प अक्षर मिळालं. चरपटपंजरीमध्ये प अक्षर आल्याने त्याने चरचर असा आवाज घेऊन कर्कश बोलायला सुरुवात केली. या झाडावरून त्या झाडावर पळापळी करताना परर, परर.. असं म्हणत खेळू लागले. त्या दिवशीपासून पोपटाला ‘प’ अक्षर मिळालं.
बकरीला खरंतर ब अक्षर द्यायचं होतं. पण काहीही प्रश्न विचारला की ही आपली ‘मी मी’ करत पुढे यायची. मग काय देवाने तिला ‘मे मे बे बे’ असे पाढेच पाठ करायला लावले आणि त्या दिवसापासून तिचं ‘मेमे बेबे’ सुरू झालं.
आषाढाच्या आधी मात्र पावशा नावाचा पक्षी खूप लांबून पावसाची बातमी घेऊन खेड्यापाड्यात येतोच. आणि खेड्यामधल्या शेतकऱ्यांना पेरणीची आठवण करून देतो. पेरते व्हा पेरते व्हा.. असं ऐकलं की शेतकरी लगेचच नांगरणीला सुरुवात करतोच आणि एक दोन दिवसातच पावशाने आणलेली बातमी खरी ठरते. पावसाला सुरुवात होते. सगळं रान हिरवं होतं. देवाने तेंव्हापासून त्याला पेरते व्हा ….हा एक शब्द दिला पण आता बरेच शेतकरी शहरात नोकरीला आले. पावशा देखील आता शहरात येऊ लागलाय. पण त्याचा संदेश मात्र तोच आहे. प्रत्येकाने आपल्या चांगल्या कामाची पेरणी करायला सुरुवात करायची असते. निसर्गासाठी काहीतरी चांगलं करत पुढे जायचं असतं. घराच्या भोवती कुंडीत अंगणात डोंगरावर झाड लावत जा असंही तो सांगतो.
पण हे इतके सगळे आवाज ऐकून चिमणी मात्र घाबरली. ती प्रत्येकाला ओरडू लागली ‘गप्प बसा …चुप चुप चुप’ आणि तेव्हापासून चिमणीला ‘चिव चिव चिव’ असा शब्द मिळाला. अशा प्रकारे देवाची बाराखडी बऱ्यापैकी पूर्ण व्हायला आली. पण बरेच प्राणी पक्षी न बोलता काम करायला लागले किंवा काही घशातून आवाज काढायला लागले. पण साप, अजगर बिळात लपल्यामुळे या प्राण्यांना मात्र काहीही अक्षर मिळाले नाही.