श्रीनगर येथील जाहीर सभेत राहुल गांधींचे उद्गार, जनतेचे मानले मनःपूर्वक आभार
श्रीनगर / वृत्तसंस्था
काँगेस नेते राहुल गांधी यांनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा ध्वज फडकावून आपल्या पदयात्रेची सांगता केल्यानंतर सोमवारी येथील जाहीर सभेत आपली भावना व्यक्त केली आहे. पदयात्रेतून आपल्याला पुष्कळ काही शिकावयास मिळाले आहे. तसेच लोकांचे प्रेमही या संपूर्ण प्रवासात मिळाले. यासाठी मी लोकांचा मनःपूर्वक आभारी आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी लोकांना संबोधित केले.
राहुल गांधींच्या जाहीर सभेच्या वेळी प्रचंड हिमवर्षाव होत होता. तसेच कडाक्याची थंडीही होती. तरीही काँगेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी त्यांचे भाषण ऐकण्यासाठी गर्दी केली होती. तरीही जे लोक उपस्थित होते, त्यांच्यासमोर त्यांनी यात्रेतील आपले अनुभव कथन केले. ज्याप्रमाणे काश्मिरी जनता आणि सैनिकांनी आपल्या प्रिय व्यक्ती गमावण्याचे दुःख सहन केले आहे, त्याचप्रमाणे मीही माझ्या आप्तस्वकीयांचा विरह सहन केला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना हे दुःख कधी समजणार नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
अहंकार उतरला
यात्रेपूर्वी आपल्या मनात अहंकाराची भावना होती. ती आता पूर्णपणे उतरली आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर हे अंतर मोठे असले तरी ते सहज पार करु असे प्रथम वाटले होते. तथापि, चालण्यास प्रारंभ केल्यानंतर पाच सहा दिवसांनी पाय प्रचंड दुखू लागले. अनेक समस्या निर्माण झाल्या. 3,500 किलोमीटरचे अंतर पार करता येईल की नाही, हा संभ्रम त्यावेळी निर्माण झाला. माझा अहंकार काहीसा दूर झाला, असा प्रारंभीच्या काळातील अनुभवही यांनी लोकांना सांगितले.
बाँब दिसले नाहीत
काश्मीरमध्ये पदयात्रा आल्यानंतर आपल्याला भीती घालण्यात आली होती. यात्रेवर बाँब फेकण्यात येण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले होते. तथापि, यात्रा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. सुरक्षा व्यवस्थेत काही गडबड झाली होती. तरीही यात्रा सुरक्षितपणे पूर्ण झाली. काश्मीरमध्ये मला कोठेही बाँब दिसले नाहीत. लोकांचा स्नेह मात्र भरपूर मिळाला, असे भावोत्कट उद्गार त्यांनी काढले.
विचारधारेसाठी पदयात्रा
ही पदयात्रा विचारधारेच्या प्रसारासाठी काढली होती. तिचा राजकारणाशी संबंध नाही. राजकीय यश मिळविण्यासाठी ही पदयात्रा नाही. लोकांना समजून घेण्यासाठी आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी ती काढण्यात आली. या यात्रेचा उद्देश सामाजिक आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी भाषणात केला.
370 वर भूमिका स्पष्ट
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेचा 370 वा अनुच्छेद निष्प्रभ केला आहे. मात्र, काँगेसची या अनुच्छेदासंबंधीची भूमिका स्पष्ट आहे. जम्मू-काश्मीरात लोकतंत्र निर्माण व्हावे या मताची काँगेस आहे. अनुच्छेद 370 वर काँगेसचा प्रस्ताव स्पष्ट आहे, अशी भूमिका गांधी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत मांडली होती. तिचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.
अनेक विरोधी पक्ष अनुपस्थित
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 21 समविचारी राजकीय पक्षांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यापैकी नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी हे काश्मीरमधील दोन प्रमुख पक्ष उपस्थित होते. मात्र, तृणमूल काँगेस, राष्ट्रवादी काँगेस आणि संयुक्त जनता दल हे प्रमुख विरोधी पक्ष अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील पक्षांचे नेतेही सभेसाठी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे, मार्क्सवादी, भाकप, राजद आदी पक्षानीही बैठकीपासून स्वतःला दूर ठेवले होते.
खर्गे यांचे भाषण अर्ध्यावर
या यात्रेमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वात एकत्र येऊ शकतील असे भाकित काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या भाषणात केले, मात्र, प्रचंड हिमवर्षावामुळे त्यांचे भाषण मध्येच थांबवावे लागले. तसेच अन्य नेत्यांच्या भाषणांनाही फाटा द्यावा लागला आहे.
प्रियांका यांच्याबरोबर खेळण्याचा आनंद
आपली भगिनी प्रियांका यांच्यासह हिमाच्छादीत वातावरणात हिमाचे गोळे फेकण्याचा खेळ राहुल गांधी काहीकाळ खेळले. दोघेही बंधू-भगिनी एकमेकांच्या अंगावर हिमाचे गोळे फेकण्याचा आनंद लुटताना दिसून आले. यावेळी काँगेस पक्षाचे काही कार्यकर्तेही या खेळात सहभागी झाले होते.
यात्रेची सांगता भाषणाने
ड यात्रा समारोपानंतर दुसऱया दिवशी राहुल गांधी यांचे भाषण
ड यात्रेमुळे जनतेशी संपर्क करण्याची संधी ः गांधीचे प्रतिपादन
ड काँगेस पक्ष विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याच्या स्थितीत ः खर्गे