विद्यार्थी-प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मागणीची दखल घेण्याची आवश्यकता
वार्ताहर /खानापूर
परीक्षा जवळ येत असल्याने विद्यार्थी वर्ग अभ्यासात गुंतला आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी नेहमीच्या वर्गाबरोबरच जादाचे वर्ग व खासगी क्लासला जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळ अपुरा पडत आहे. त्यासाठी बिडी, नंदगड, खानापूर, रामनगर, बेळगाव दरम्यानच्या रस्त्यावर जादा बसेस सोडण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
कक्केरी, लिंगनमठ, भुरुणकी, बेकवाड, बिडी, नंदगड, लालवाडी, लोंढा, मेरडा, हलशी, गुंजी, चापगाव, देवलत्ती, शिरोली, हेम्माडगा, गणेबैल, इदलहोंड, गर्लगुंजी, जांबोटी, कणकुंबी, भागातील विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी नंदगड, खानापूर, बेळगाव येथे जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सकाळी लवकर महाविद्यालयाला जावे लागते. बस वेळेवर न मिळाल्यास शिक्षणावर परिणाम होत आहे. प्रत्येक गावात बसथांब्यावर विद्यार्थ्यांची गर्दी असते. बस सुविधेच्या कमतरतेमुळे वेळेत शाळा महाविद्यालयाला पोहोचणे कठीण बनत आहे.
अपुऱ्या बसेसमुळे शाळा, महाविद्यालयाला पोहचण्यासाठी तसेच सायंकाळी सुटल्यानंतर गावी परतताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे खानापूर, नंदगड, बिडी तसेच खानापूर-नंदगड-नागरगाळी, खानापूर-गुंजी-रामनगर, खानापूर-जांबोटी-कणकुंबी, खानापूर-बरगाव-गर्लगुंजी आदी मार्गावर जादाच्या बसफेऱ्या वाढविणे आवश्यक आहे.
पहाटे साडेसहा ते 9 वाजेपर्यंत ग्रामीण भागातून खानापूर, बेळगाव या शहराकडे धावणाऱ्या बसेसची संख्या वाढवावी व दुपारी 4 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत बेळगाव, खानापूरहून ग्रामीण भागात जाणाऱ्या बसफेऱ्या वाढवाव्यात.
कामगारांची संख्या वाढली
आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी काम करून चार पैसे मिळविण्याची प्रवृत्ती आता युवकांत निर्माण झाली आहे. त्यामुळे खानापूरसह खेडोपाड्यातील युवक खानापूर, बेळगाव शहरात दुकानातून, कारखान्यात व अन्य ठिकाणी काम करीत आहेत. साहजिकच प्रवासी वर्गात यांची भर पडली आहे. बेळगावपासून खानापूर व खेडेगावी जाण्यासाठी बस व खासगी टेम्पो सोयीचे आहेत. त्याचा लाभ ज्यांना होत आहे. पण वाढत्या गर्दीमुळे आता त्यांच्यातूनही जादा बस फेऱ्यांची मागणी होत आहे.
रुग्णांची होतेय गैरसोय
खानापूरसह तालुक्यातील बरेच लोक हृदयरोग, रक्तदाब, मधूमेह रोगानी त्रस्त आहेत. त्यासह अन्य विकारावरही उपचार घेण्यासाठी खानापूर व बेळगावला जातात. अशावेळी त्यांना सुलभ प्रवास करण्यासाठी बसेसची सोय होणे गरजेचे आहे.