राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपने मिळविलेला विजय आणि शिवसेनेच्या दुसऱया उमेदवाराचा झालेला पराभव बघता ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची न करताही जिंकली. या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणे सध्या तरी बदलण्याची शक्यता नसली तरी येत्या 20 जूनला होत असलेली विधानपरिषद निवडणूक ही भाजप आणि महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची असणार आहे. सोमवारी भाजप पुरस्कृत उमेदवार सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी जरी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी येत्या 20 जून रोजी 10 जागांसाठी विधानपरिषद निवडणूक होत असून 11 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने पुरेसे संख्याबळ नसताना 5 उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीचे सरकारसमोर आव्हान असणार आहे. भाजपकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच टार्गेट असल्याचे भाजपने शिवसेनेचा दुसरा उमेदवार पाडून दाखवून दिले. आता आठ दिवसांवर आलेल्या या निवडणुकीवर पुढील सर्व राजकीय समीकरणे अवलंबून असणार
आहेत.
राज्यसभा निवडणुकीत भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येणे आणि पुरेसे संख्याबळ असताना शिवसेनेचा दुसरा उमेदवार पडणे यातून आता एक सिध्द झाले की छोटे पक्ष तसेच काही अपक्ष आमदार हे सरकारसोबत नाहीत. त्यामुळे येत्या 20 जून रोजी होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत सरकारमधील तीनही पक्षांचा कस लागणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने 2, काँग्रेसने 2, राष्ट्रवादीने 2 तर भाजपने 5 उमेदवार उभे केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप, सचिन अहीर यांना उमेदवारी दिली आहे आणि राष्ट्रवादीने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा क्रमांक एकचा शत्रू असलेल्या एकनाथ खडसे यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे ठरवले आहे. राज्यसभा निवडणुकीचे निकाल बघता ही निवडणूकही चुरशीची होणार यात शंका नाही. राज्यसभेची निवडणूक ही खुल्या पध्दतीने होते. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्याही पक्षांची मते फुटली नसली तरी विधानपरिषद निवडणूक ही गुप्त मतदान पध्दतीने होत असल्याने या निवडणुकीत अपक्ष आणि छोटय़ा पक्षांसोबत आपल्या स्वतःच्या पक्षाच्या आमदारांची मते सांभाळण्याचे मोठे कसब सर्वच पक्षांसमोर असणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काम करत नाहीत वेळ देत नाहीत, नॉट रिचेबल असतात अशी आमदारांची नाराजी असल्याचे निकालानंतर समोर आले. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते तर मतदान करण्यासाठी सुध्दा येत नव्हते मात्र मिलिंद नार्वेकर यांनी त्यांची मनधरणी केली आणि ते मतदानाला आले, मात्र त्यांनी दिलेला शब्द न पाळल्यास 20 तारखेला होणाऱया विधानपरिषद निवडणुकीत बघुन घेऊ असा थेट इशाराच दिला तर शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल, शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी यापूर्वी सरकारच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे अशा नाराज असलेल्या आमदारांना विधानपरिषद निवडणुकीत सांभाळणे याचे मोठे आव्हान सर्वच पक्षांसमोर असणार आहे.
काँग्रेससमोर मोठे आव्हान
सध्याच्या संख्याबळानुसार विधानसभेत भाजप-106, शिवसेना-55, राष्ट्रवादी काँग्रेस-53 आणि काँग्रेस-44 असे संख्याबळ आहे. 10 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत भाजपने 5 उमेदवार उभे केले आहेत, त्यांचे 4 उमेदवार निवडून येऊ शकतात तर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी 2 उमेदवार उभे केले आहेत. त्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून येऊ शकतात मात्र काँग्रेसचे संख्याबळ पाहता काँग्रेसच्या दुसऱया उमेदवाराला 10 ते 12 मतांचे बाहेरुन नियोजन करावे लागणार आहे, आता राज्यसभा निवडणुकीनंतर आघाडीतील मित्र पक्षांमध्येच साशंकता निर्माण झाल्याने आणि प्रत्येकाने आपले उमेदवार निवडून आणण्याची जर जबाबदारी घेण्याचे ठरविले तर काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून येणे कठीण आहे. पण ऐनवेळी काहीही चत्मकार घडू शकतो, घडवला जाऊ शकतो.
अपक्ष आमदारांमुळे सरकार
राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही अपक्षांनी तसेच बविआ सारख्या पक्षाने भाजपला मतदान केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी करताना या आमदारांना बघून घेण्याचा इशारा दिला, मात्र या अपक्ष आमदारांमुळे सरकार आहे. सरकारमधील अपक्ष मंत्री असलेले बच्चू कडू यांनी थेट राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्याने अपक्ष आमदारांची भूमिका विधानपरिषद निवडणुकीत महत्त्वाची असणार आहे. अन्यथा या आमदारांनी काही वेगळी भूमिका घेतल्यास विधानपरिषद निवडणुकीनंतर सरकारच्या स्थैर्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
पक्षांर्तगत नाराजांना सांभाळण्याचे आव्हान
तीन पक्षांचे सरकार त्यात अनेकांना मंत्रीपद मिळालेले नाही तर काहींना मंत्रीपदाचे दाखवलेले गाजर त्यामुळे अनेक पक्षांचे आमदार हे सरकारवर आणि स्वतःच्या पक्षावर नाराज आहेत, त्यातील काहींनी नाराजी व्यक्त केली तर काही मूग गिळून गप्प आहेत अशा आमदारांना गळाला लावण्याचे काम भाजपकडून होऊ शकते, शिवसेनेचे शहाजी पाटील, तानाजी सावंत, काँग्रेसचे मुंबईतील आमदार झिशान सिद्दकी आणि भाई जगताप हे अनेकवेळा आमने सामने आलेत. त्यामुळे अशा अनेक आमदारांची निवडणुकीआधी नाराजी दूर करावी लागणार आहे.
भाजप एकही संधी सोडणार नाही
भाजप सरकारला नामोहरम करण्याची विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही हे भाजपने शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतावर घेतलेला आक्षेप आणि त्यांचे मत बाद ठरवून दाखवून दिले, अपक्षांनीच आम्हाला तिसरा उमेदवार मागे घेऊ नका असे सांगितले आणि आम्ही तिसरा उमेदवार कायम ठेवल्याचे फडणवीस यांनी सांगत सरकारच्या विरोधात कशी नाराजी असल्याचे सांगितले. केंद्रीय तपास यंत्रणांचा काही आमदारांच्या मागे असलेला ससेमिरा बघता अशा आमदारांनाही भाजपकडून काही आश्वासन विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर दिले जाऊ शकते, शेवटी एक नक्की स्वतः शरद पवारांनी कौतुक केल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस कोणत्या ना कोणत्या मार्गाने लोकांना आपलेसे करतात आता विधानपरिषद निवडणुकीत ते कोणाला आणि कोणत्या मार्गाने आपलेसे करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे