पाळीव प्राणी, मानवावरील हल्ल्यात वाढ
तज्ञांची समिती नेमून अभ्यास व उपाययोजनांची गरज
शित्तुर वारुण / बी टी पाटील
चांदोली परिसरासह शिराळा, शाहूवाडी, तालुक्यात बिबटय़ांचे वारंवार दर्शन होऊ लागले आहे. बिबटय़ाचे पाळीव प्राण्यांवरील हल्लेही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. आता तर मानवावर ही हल्ले होऊ लागलेत तरीही वनविभाग गप्प का असा सवाल लोकांच्यातून उपस्थित होत आहे. नुकताच उखळू येथील श्रेयश वडाम या शाळकरी मुलावर झालेला हल्ला व पाठोपाठ शिराळे वारूण येथील शेळीवरील हल्ला या घटनामुंळे अभयारण्य परिसरातील माणसानी जगायचे कसे ? अशा वारंवारच्या घटनामुळे चांदोली परिसरामध्ये बिबटय़ांची दहशत निर्माण झाली आहे.त्यामुळे लोकांच्यात घबराटीचे वातावरण आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱया चांदोली व कोयना अभयारण्य परिसरामध्ये साधारण 45 ते 50 च्या दरम्यान बिबटे आहेत. त्याहून अधिक बिबटे सध्या प्रकल्प क्षेत्राबाहेर असण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी वारंवार या बिबटय़ांचे होणारे दर्शन पाळीव प्राण्यांवरील हल्ले यामुळे हे स्पष्ट होत आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात व शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागात तर दररोज कोठे ना कोठे तरी बिबटय़ाचे दर्शन होत आहे.
गेल्या दोन वर्षापूर्वी कोरोनामुळे लॉकडाऊन झाले अन परिसर निर्मनुष्य झाला व पर्यावरणाच्या दृष्टीने पोषक वातावरण तयार झाले आहे. बिबटय़ाच्या वावरासाठी हे वातावरण अनुकूल असल्यामुळे ठिकठिकाणी त्याचे दर्शन होऊ लागले आहे. गेल्या दोन दशकांत तर बिबटय़ाने आपले आश्रय स्थानच बदलले आहे.अनेक बिबटय़ांच्या मादीने उसाच्या रानामध्ये व वाडय़ावस्तीवरील डोंगरकपारीतील झाडा झुडपात आपल्या पिलांना जन्म दिला आहे. जंगल हे या पिल्लांना माहितच नाही उसाचं रान व झाडेझुडपे म्हणजेच आपलं जंगल आहे ही भावना त्यांच्यामध्ये रुजू झाली आहे.शिवाय जवळपासच शिकार त्यांना सहज उपलब्ध होत आहे.जंगलामध्ये अनेक किलोमीटरचा पाठलाग करून मिळणारी शिकार त्याला मानवी वस्तीत सहजासहजी मिळू लागली आहे. कुत्रे हे तर त्याचे प्रमुख आवडते खाद्य आहे.ही शिकार त्याला मानवी वस्तीत सहज मिळू लागल्यामुळे या ठिकाणी त्याचे अस्तित्व वाढू लागले आहे.
वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी प्राणी गणना केली जाते. वाघ व बिबटय़ा ची विष्ठा, पाऊलखुणा, झाडांवरील ओरखडे याद्वारे वाघ व बिबटय़ांची संख्या निश्चित केली जाते. अशीच गणना सामाजिक वनीकरण विभागात करणे सध्या गरजेचे आहे.जेणेकरून प्रकल्पात तसेच प्रकल्प बाहेर सध्या किती बिबटे आहेत याची निश्चित आकडेवारी समजेल.
बळीराजाचेही पाळीव प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसान होऊ लागले आहे. या परिसरात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्याला जोडधंदा म्हणून शेळ्या मेंढय़ा, गाईम्हशी हे उदरनिर्वाहाचे जगण्याचे प्रमुख साधन आहे. तेच आता बिबटे व जंगली हिंस्र प्राणी हिरावून घेत आहेत. तर शासनाकडून तुटपुंजी मदत मिळत आहे. मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.
मानवी वस्तीमध्ये बिबटय़ांचा वाढलेला वावर प्राण्यांवर तसेच मानवावर होणारे हल्ले याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने तज्ञांची समिती नेमावी व शासनस्तरावरून याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यामध्ये मानव व बिबटय़ा यांचा संघर्ष अटळ आहे.
बिबटय़ाने आपल्या राहणीमानात बदल केला आहे. शिवाय गावालगत त्याला सहज शिकार मिळू लागली आहे. त्यामुळे त्याने आपले आश्रयस्थान बदलले आहे. आता तो अभयारण्या पुरता मर्यादित राहिलेला नाही. उसाची शेती व गावाशेजारील डोंगरकपारीतील झाडी हेच त्याचं आश्रयस्थान बनू लागले आहे .त्यामुळे परिसरात त्याचे वारंवार दर्शन होऊ लागले आहे.हे खरे असले तरी लोकांनी भिती न बाळगता दक्षता घेणे आवश्यक आहे.
नंदकुमार नलवडे, वनक्षेत्रपाल, चांदोली राष्ट्रीय उद्यान