राज्यात येऊ पहात असलेल्या मोठय़ा गुंतवणुकीचा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. गेली काहीवर्षे हा प्रकल्प महाराष्ट्रात,पुण्यात यावा म्हणून वेदांतचे व्यवस्थापन प्रयत्नशील होते. ही गुंतवणूक आणि त्यानिमित्ताने रोजगार आपल्या राज्यात यावा म्हणून महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तामिळनाडू, तेलंगणा यांच्यात स्पर्धा होती पण या कंपनीच्या उत्पादनासाठी आवश्यक पॉलिसी महाराष्ट्रात अस्तित्वात होती म्हणून या कंपनीला महाराष्ट्रात रस होता. पण गेली काहीवर्षे सुरु असलेले राजकारण आणि कंपनी सोबतच्या वाटाघाटी यांना अपयश आले आणि अधिक सवलती, सोयी आणि स्वागत या पार्श्वभूमीवर वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात न करता गुजरातमध्ये करण्याचा निर्णय झाला. ओघानेच गुंतवणूक गेली, रोजगार संधी गेल्या आणि राजकीय चिखलफेकीला नवा विषय मिळाला. तसे हे काही पहिले प्रकरण नाही. अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर रस दाखवताना दिसत आहेत. सांगली-कोल्हापूर भागातील काही उद्योजक कर्नाटकात आपला उद्योग हलवणार असे वारंवार सांगत आहेत. यामागे खरे कारण आहे वाटाघाटी आणि धोरणे पण उद्योजकांच्या या अडचणी दूर करुन महाराष्ट्रात नवी गुंतवणूक आणण्याकडे, युवकांच्या हाताला काम देण्याकडे कुणाचेच लक्ष नाही. सारे आपले राजकारण व स्वहित जपण्यात भूषण मानत आहेत. एकमेकांना दुषणे देत आहेत. इतर राज्याशी स्पर्धा करायची तर स्वार्थ बाजूला ठेऊन महाराष्ट्रहित जोपासले पाहिजे आणि उद्योग-व्यवसायासाठी पोषक पावले उचलली पाहिजेत. हे सारे कळते पण वळत नाही. काही अभ्यासक ज्यांना दूरचे दिसते त्यांच्यामते जग बदलते आहे. कोरोनानंतरचे जग वेगळे आहे. आगामी पाच-दहा वर्षात जग पूर्ण बदलेल. आज ज्या नोकऱया आहेत त्यातील सत्तर टक्के नोकऱयांची गरजच उरणार नाही. स्मार्टफोन अधिक स्मार्ट होतील. बँका, शाळा, वीजपुरवठा, शेती, व्यापार, उद्योग यामध्ये अमुलाग्र बदल होतील. ड्रायव्हर लेस गाडय़ा, रेल्वे सुरु होतील. ड्रायव्हर ही नोकरी संपेल. वीज पुरवठा प्रिपेड कार्डने सुरु होईल. ओघानेच कनेक्शन, बिले, मीटर रिडींग, पुरवठा तोडणे-जोडणे असे सारे बेरोजगार होतील, ऑनलाईन सात-बारा, खाते उतारा, मोजणी, दवंडी, मतदान यामुळे अनेक नोकरदार बेरोजगार होतील, जिल्हाधिकाऱयांनाही स्वीय सहाय्यक मिळणार नाही. त्यांना स्मार्टफोनवर स्वतःच ते काम करावे लागेल. कोर्ट, कचेरी, साक्षी, समन्स यातही मूलभूत बदल होतील. वैद्यकीय क्षेत्र, कृषी उद्योगातही मोठे बदल होतील. रोबो कार्यरत होतील. बँकिंग तर मुळातून बदलेल. या सर्वांचा फटका आज कार्यरत असलेल्या सातवे वेतन घेणाऱया नोकरशाहीला बसेल. जॉबलेस प्रगतीची सुरुवात झाली आहे. ती वाढेल पण माहिती तंत्रज्ञान, बायोटेक्नोलॉजी व नॅनोटेक्नॉलॉजी यामध्ये रोजगाराच्या नव्या संधी मिळतील पण त्यासाठी गुणवत्ता, अचूक निर्णयक्षमता आणि सखोल तंत्रज्ञान अवगत असलेले कर्मचारी लागतील. आज महाराष्ट्र आणि देश याबाबतीत कोठे आहे याचे आत्मचिंतन केले पाहिजे. माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण व संपर्क क्रांती यामुळे जग जवळ येत चालले आहे. अशावेळी राजकारण वाटाघाटीतून बाहेर येऊन उद्योग-व्यवसाय व लोकहिताचे झाले पाहिजे. शेजारचे राज्य जमीन, वीज, पाणी, पायाभूत सुविधा चांगल्या व स्वतः देणार असेल तर कुणीही शहाणा माणूस नुकसान करुन घेणार नाही. वेदांत फॉक्सकॉनने गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. खरे तर वेदांतने पुण्याजवळ जागाही घेतली होती. वेदांत ही कंपनी सेमी कंडक्टर उद्योगात पंधरा मिलीयन डॉलर गुंतवणूक करणार आहे. 2016 मध्ये महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी स्वीकारली म्हणून कंपनीला महाराष्ट्रात रस होता पण गेले दीड वर्षे सरकार सोबत त्यांची बोलणी यशस्वी झाली नाहीत व अखेर त्यांनी गुजरातचा निर्णय घेतला. गुजरात सरकारने कंपनीला भांडवली गुंतवणुकीवर आर्थिक व इतर सवलती, अहमदाबादजवळ 99 वर्षासाठी एक हजार एकर मोफत जमीन, 20 वर्षासाठी पाणी व वीज स्वस्त दरात देण्याचे ठरवले आणि करारासाठी निमंत्रण दिले. महाराष्ट्रात हे होत नाही. आघाडय़ा, युत्या, स्थानिक नेते, कामगार नेते, अर्ज, विनंत्या ना हरकत पत्रे यामध्ये उद्योजक मेटाकुटीला येतो आणि नको, नाही म्हणत अन्य राज्यात जातो. टिका-टिप्पणी होत राहील, राजकीय रेवडय़ा उडवल्या जातील पण काळाशी व स्पर्धेशी सुसंगत पावले आपण केव्हा टाकणार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य असलेले कर्मचारी आणि सार्वजनिक हित जपणारे नेतृत्व आम्ही कधी निर्माण करणार या प्रश्नातच वेदांत फॉक्सकॉनने बस्तान का हालवले या प्रश्नाचे उत्तर आहे. पायउतार झालेले नेते व सत्तासिंहासनावरचे नेते या गोष्टींना जितके जबाबदार तितकेच आपणही जबाबदार आहोत. नव्या आर्थिक सुधारणा आणि जागतिकीकरण यानंतर आम्ही आमच्यात, कार्य संस्कृतीत बदल केले नाहीत. वाटाघाटी आणि चिखलफेक, जात, आरक्षण आणि तोडपाणी यातून बाहेर यायला आपण तयार नाही. जे गरीब आहेत, मागे पडलेत त्यांना जरुर मदत केली पाहिजे. मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. पण सावध हाका ऐकून पुढची पावले टाकली पाहिजेत. जोडीला उद्योगाचे विकेंद्रीकरणही गरजेचे आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या पलीकडेही महाराष्ट्र आहे. तरुण आहेत. तेथेही समृद्ध शेती आहे. शेतीपूरक उद्योगांना संधी आहेत, औद्योगिक वसाहती आहेत. या छोटय़ा-लहान गावातील माणसांना उद्योग, व्यवसाय दिले पाहिजेत. पण वाटाघाटीत घाटा घेऊन अनेक जणांना वाटा देण्यात कोणताच उद्योग रस घेणार नाही. आपली हुशार मुली-मुले मोठय़ा शहरात आणि विदेशात का जातात याचाही विचार झाला पाहिजे. शेती, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा या संदर्भात घोषणा खूप होतात. पण काम खूप करण्याची गरज आहे तसे झाले तर वेदांत गुजरातला गेला म्हणून गळा काढण्याची गरज नाही. राज्यात नवे सरकार सत्तेत येऊन दोन महिने झाले आहेत ते काय करते, कसे निर्णय घेते हे महत्वाचे पण या प्रकरणातून राज्याने धडा शिकला पाहिजे. वेदांतचा धडा पुन्हा-पुन्हा नको यासाठी पावले टाकली पाहिजेत.
Previous Articleकालिदासाचे मेघदूत…एक खंडकाव्य (51)
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.