ठेकेदाराच्या रस्ते कामात टक्केवारीची ‘कीड’ मग दर्जेदार रस्ते होणार कसे?
विनोद सावंत/कोल्हापूर
शहरातील रस्ते करणे, पॅचवर्क करण्यासाठी महापालिका स्वावलंबी होती. सार्वजानिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित होती. गेल्या काही वर्षापासून येथील कर्मचाऱयांची बदली इतर विभागात झाली आहे. यापैकी काहींनी वशिल्यांने कार्यालयांमध्ये बदली करून घेतली आहे. परिणामी पीडब्ल्यूडी विभाग नावालाच राहिला असून नव्याने रस्ते करणे सोडाच… पॅचवर्कसाठीही ठेकेदारावर अवलंबून रहावे लागत आहेत. यामध्येच ‘काम झाले, बिल मिळाले… संपला विषय’ अशी भूमिका ठेकेदाराची आहे. यामुळे दर्जेदार रस्ते होत नाहीत. दरवर्षी शहर खड्डेमय होते. त्यामुळे पुन्हा पीडब्ल्यूडी विभाग सक्षम करण्याची गरज आहे.
शहरातील रस्त्यांची दयनीय स्थिती झाली आहे. रस्ते कमी आणि खड्डेच जास्त झाले आहेत. पॅचवर्कही परतीच्या पावसात वाहून गेले आहे. खड्डय़ामुळे अपघातचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये मनपा उपजल अभियंत यांच्या आईचा खड्डय़ात पडून मृत्यू झाल्याने शहरातील खराब रस्ते पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.
शहरातील गल्ली बोळासह काही मुख्य रस्त्यांसह पॅचवर्कही महापालिका स्वतःची यंत्रणी वापरून केले जात होते. महापालिकेचा सार्वजानिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) विभागामार्फत ही सर्व कामे केली जात होती. या विभागात डांबरीसाठी हंगामी आणि कायम कर्मचारी कार्यरत होते. केवळ मुख्य रस्ते निविदा काढून केली जात होती. सध्या सर्वच रस्ते ठेकेदारामार्फत करून घेणे सुरू झाले. दरम्यान, या विभागातील कर्मचारी इतर विभागात बदली होऊन गेले. उरले सुरले काही कर्मचारी पॅचवर्कचे काम करत होते. काही दिवसांपासून तेही बंद झाले आहे. नवीन रस्त्यांसह पॅचवर्कची सर्वच काम आता ठेकेदारामार्फत करून घेतली जातात. तसेच मनपाचा झुम प्रकल्प येथील डांबरी प्लँट सहा महिने बंद असतो.
मलईसाठीच ठेकेदार
पीडब्ल्यूडीची यंत्रणा वापरून यापूर्वी केलेले रस्ते दर्जदार होते. ठेकेदारामार्फत जेव्हापासून सर्वच रस्ते करण्यास सुरू झाले. तेव्हापासून रस्त्यांचा दर्जा ढासळला. मनपातील काही यंत्रणांनी हे जाणूनबुजून केले आहे. स्वतः मनपाने कामे केल्यास मलई कमी मिळते किंवा ती मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. ठेकेदारामार्फत रस्ते केल्याने मलई रोख आणि जलद मिळते.
‘पीडब्लूडी’चे अकाऊंट विभागात 10 कर्मचारी
मुख्य इमारतीमधील अकाऊंट विभागात पीडब्लूडीतील 10 कर्मचारी बदलीहून आले आहेत. वास्तविक हे कर्मचारी डांबरीकरणावर असणे आवश्यक होते. मात्र, असे होताना दिसून येत नाही. पीडब्लूडी विभागाच रिकामा झाल्याने पॅचवर्कसाठी ठेकेदारावर अवलंबून राहण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे.
डांबरीवरील कर्मचारी बनले वॉचमन
डांबरीवर असणाऱया कर्मचाऱयांपैकी बहुतांशी कर्मचारी घरफाळा, इस्टेट, अधिकाऱयांची कार्यालयासह वॉचमन डय़ूटीवर आहेत. यामध्ये मनपा कार्यालय, उद्यान, व्यायामशाळातील वॉचमनचा समावेश आहे. अशा स्थितीत डांबरीची कामे होणार कसी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निधीतील 56 टक्के रक्कमेचे वाटप. दर्जेदार रस्ते होणार कसे?
ठेकेदाराला मिळणाऱया निधीतील 56 टक्के निधी वाटूनच संपतो. यामध्ये शिपाईपासून वरीष्ठांपर्यंत याचा वाटा कामाच्या टक्केवारीनुसार ठरलेला आहे. 40 टक्के रककम यातच जाते. 18 टक्के जीएसटी जमा करावा लागते. उर्वरीत 44 टक्के निधीमध्ये 100 टक्के कामे आणि तेही दर्जेदार कसे होणार असाही प्रश्न आहे.
कार्यालत बसून बिले वाटप
वास्तविक विभागीय कार्यालयातील संबंधित अभियंतांनी जागेवर जावून रस्त्याचे सुपरव्हिजन करूनच ठेकेदाराला बिल देणे अपेक्षित आहे. परंतू टेबल खालून व्यवहार झाल्यानंतर कार्यालयामध्येच बसून धनादेश दिले जातात. दर्जेदार रस्ते होत नसल्याने मुदतीमध्येच ते खराब होत असून नागरिकांना मात्र, याचा त्रास सहन करावा लागत आहे.
नवीन काम, नवीन मलाई
दर्जदार रस्ते होऊच नयेत अशी यंत्रणा महापालिकेत सक्रीय झाली आहे काय असा संशय आता व्यक्त होत आहे. रस्ता खराब झाल्यानंतर तेथे पुन्हा निविदा काढून ठेके देणे आणि त्यातून पुन्हा मलई मिळवणे, असाच काही उद्योग सुरू आहे.
‘पीडब्ल्यूडी’ची स्थिती
मंजूर पदे -650
कार्यरत कर्मचारी-250
सध्या विभागात कार्यरत-50
इतर विभागात बदली-200
‘पीडब्लूडी’ विभाग नावालाच
महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी) नावालाच उरला आहे. डांबरी काम नको म्हणून काहींनी वशिल्याने अधिकाऱयांच्या कार्यालयात बदली करून घेतली आहे. यामध्ये उपायुक्त, सहायक आयुक्तांच्या एसी कार्यालयात बसून त्यांचे काम सुरू आहे. यामुळे पॅचवर्कची कामेही निविदा काढूनच करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.