किरण ठाकुर यांचे आवाहन : वेंगुर्लेत बॅ.नाथ पै फाऊंडेशनवतीने समुदाय केंद्राचे भूमिपूजन
प्रतिनिधी /वेंगुर्ले
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न सुटावा व कोकणात रेल्वे यावी, अशी बॅ. नाथ पै यांची दोन स्वप्ने होती. प्रा. मधु दंडवते यांनी नाथ पै यांचे कोकण रेल्वेचे स्वप्न पूर्ण केले. आता त्यांचे पहिले स्वप्न कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी वेंगुर्ले येथे केले.
वेंगुर्ले न. प. आणि बॅ. नाथ पै फाऊंडेशनच्यावतीने वेंगुर्ले कॅम्प येथे दोन कोटी रुपये खर्चाच्या बॅ. नाथ पै समुदाय केंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमाला किरण ठाकुर यांनी भेट दिली. बॅ. नाथ पै फाऊंडेशनच्या अध्यक्षा आदिती पै, त्यांचे वडील शैलेंद्र पै यांच्याशी चर्चा करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी कुडाळ येथील बॅ. नाथ पै कॉलेजचे चेअरमन उमेश गाळवणकर, आर्किटेक्ट अमित कामत, ‘तरुण भारत’चे वितरण विभागप्रमुख सचिन मांजरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, युवासेना प्रमुख पंकज शिरसाट, शिवसेना जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर आदी उपस्थित होते.