पाणी योजनांसाठी पैसे नसतील तर सत्ता सोडा
जत/प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळी भागातील सिंचन योजने साठी महाविकास आघाडी सरकारकडे निधी नसेल तर त्यांनी सत्तेवरून पायउतार व्हावे. भाजप व रिपाईचे सरकार सत्तेवर येताच सिंचनाच्या सर्व योजना मार्गी लावू , असे सांगून २०२४ ला विधानसभेत राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
ते जत येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपाईचे प्रदेश सचिव विवेक कांबळे होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष संजयराव कांबळे, शहाजी कांबळे, जगन्नाथ ठोकळे, सुरेश बारशिंगे, उपमहापौर छाया वाडेकर , विनोद निकाळजे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, नंदकुमार केंगार, विकास काका साबळे, हेमंत चौगुले, राजेंद्र खरात, अविनाश वाघमारे, संजय कांबळे -पाटील, अश्विनी देवकते, सुभाष कांबळे, प्रशांत एदाळे , हर्षवर्धन कांबळे, छाया सरवदे , विलास बाबर, संजय पाटील, आदी उपस्थित होते.
ना. आठवले म्हणाले, राज्यातील जनतेनी २०१९ ला भाजपच्या हाती सत्ता दिली होती .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम लोकांच्या पसंतीस उतरले होते. परंतु शिवसेना ,राष्ट्रवादी, काँग्रेस या तिघांनी मिळून राज्यात महाविकास आघाडीची अभद्र युती केली. गेल्या तीन वर्षात या सरकारने कसलेही काम केले नाही. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर येईल वास्तविक सत्ता मिळाल्यावर राज्यातील प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवे होते परंतु आज राज्यातील चित्र वेगळेच दिसत आहे.
दुष्काळी भागातील सिंचन योजना, कष्टकरी, मजूर, दीनदलित, गरिबांचे प्रश्न सुटले नाहीत . याचा राग जनतेच्या मनात खदखदत आहे. जतसारख्या दुष्काळी भागातील पाणी योजनेचा प्रश्न अजून तसाच आहे. पण आम्ही तुम्हाला आश्वासित करतो केंद्र सरकारच्या माध्यमातून जत तालुक्याला लागेल ती मदत देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करू.
शेतकरी मेळावा दिशादर्शक
ना. आठवले म्हणाले, तिकडे राज्य सरकारला जनतेच्या प्रश्नाची, शेतकऱ्यांची चिंता नाही. पण आमचा पक्ष सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन काम करत आहे , सर्व समाजासाठी काम करणारा आमचा पक्ष आहे . सांगलीच्या वसंतदादांनी पाणी आडवा पाणी जिरवा हा संदेश दिला, पण याच जिल्ह्यातील हा भाग पाण्यापासून वंचित आहे, त्यामुळे आजचा हा मेळावा नक्कीच दिशादर्शक ठरणार आहे. तालुक्यातील वंचित गावाच्या पाण्याचा प्रश्न केंद्रात मांडणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलून जतच्या प्रत्येक गावात पाणी पोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना विवेक कांबळे म्हणाले देवाधर्माचे भांडवल करून राजकीय पोळी भाजण्याचे काम आज राज्यात सुरू आहे हा विचार लोकशाहीसाठी घातक आहे. यावरून राज ठाकरेंनी राजकारण सुरू केले. पण रिपाई मुस्लिम बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे .लोकशाहीत सर्व जाती धर्माला संविधानाने अधिकार दिले आहेत .त्यामुळे कोणीही देवा धर्माचे राजकारण करून लोकशाहीला बाधा आणू नये , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारे काम नामदार आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपाई करत आहे .एकीकडे देवा धर्माचे राजकारण सुरू असताना येथे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत आहोत यातून जनतेने बोध घ्यावा.
स्वागताअध्यक्ष संजयराव कांबळे म्हणाले तालुक्यातील वंचित गावांना पाणी मिळावे यासाठी हा शेतकरी मेळावा घेतला आहे .नामदार आठवले यांनी पुढाकार घेऊन वंचित ६५ गावाच्या योजनेसाठी लागणारे आठशे कोटी निधी मंजूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पुढाकार घ्यावा .तालुक्यात रुग्णासाठी रुग्णवाहिका द्यावी, आदी मागण्या त्यांनी केल्या.
आंबेडकरी चळवळ संपणार नाही
जत तालुक्यात आंबेडकरी चळवळीची बीजे खोलवर रुजली आहेत. पण काही लोक ही चळवळ मोडीत काढण्याचे षड्यंत्र करत होते. त्याना या मेळाव्याने चोख उत्तर मिळावे मिळाले असल्याचे रिपाईचे जिल्हाध्यक्ष तथा संयोजक संजय कांबळे यांनी सांगितले. याचवेळी ना. आठवले यांनी संजय कांबळे यांना मोठी ताकद देऊ असे स्पष्ट केले.
काँग्रेस राष्ट्रवादीला का सोडत नाही
ना. आठवले म्हणाले, एकीकडे काँग्रसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला म्हणत आहेत, पण ते त्यांची साथ काही सोडत नाहीत.तुम्ही खंजिरमुळे रक्तंबबाळ झाला असाल तर त्या वाटेला जाऊ नका असा खोचक टोला ना. रामदास आठवले यांनी लगावला.