अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्यावरील आपले लक्षवेधी फोटो शेअर करत अनेकांना सुखद धक्का दिला असला तरी मालदिवला मात्र हा जबर धक्का ठरला आहे. मालदिवमधील तीन मंत्र्यांच्या कथित वेदनादायी प्रतिक्रियानंतर मालदिव पर्यटनावर बंदीचा नारा भारतीयांनी सुरू केला आणि लगोलग अनेक आगाऊ बुकिंग्स भारतीयांनी रद्द केल्या. याने मालदिव सरकार खडबडून जागे झाले आणि त्यांनी तथाकथित तीन मंत्र्यांना डच्चू देणे योग्य मानले. हे प्रकरण एवढ्यावरच राहिले नाही. भविष्यात हे प्रकरण वेगळे वळण घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यानिमित्ताने आता भारतीय पर्यटकांनी गुगलवर लक्षद्वीपची माहिती जाणून घेण्यासाठी जास्तीतजास्त उत्सुकता दर्शविली असल्याचे दिसले आहे. दरवर्षी 15 ते 20 टक्के भारतीय मालदिवला भेट देत असतात. यात यंदा घट झाली तर नवल वाटायला नको. लक्षद्वीपला भेट देण्याबाबत बॉलिवूड अभिनेत्यांनी देखील आग्रह वर्तविल्याने आता हेच ठिकाण यावर्षी सर्वाधिक देशी पर्यटकांचे ठरले तर नवल ते काय. सोशल मीडियावर भारतीय पर्यटक आता लक्षद्वीपमधील विविध समुद्र किनाऱ्यांची,
हॉटेल्सची माहिती मिळविण्यासाठी धडपडत आहेत.
कोणत्याही ठिकाणी पर्यटनाला जाण्याआधी भारतीय तेथील खर्चाचा आवर्जुन विचार करत असतात. जर का एखाद्याला मालदिवला पर्यटनाला जायचे असेल तर त्याला विमान खर्चासाठीच येण्या-जाण्याकरिता 30 हजार रुपये मोजावे लागतील. 30 दिवस आधी विमानाचे बुकिंग करावे लागते. एका दिवसाचा राहण्याचा हॉटेल्सचा खर्च 7 ते 10 हजार रुपये आहे. रोजच्या खाण्यासाठी कमीतकमी हजार रुपये आणि पर्यटनस्थळांना भेटीसाठी 4500 रुपये किमान खर्च करावे लागतात. याशिवाय टॅक्सी व अन्य खर्चासाठी 5000 रुपये बाजूला ठेवावे लागतात. म्हणजेच एका दिवसाचा खर्च साधारण 18 हजार रुपयांपर्यंत एका जोडीदाराला येऊ शकतो.
पण समजा आता भारतीय पर्यटकांनी लक्षद्वीपला जाणं पसंत केले तर त्यांना किती खर्च येईल हे पाहणे रंजक आहे. दिल्लीहून लक्षद्विपसाठी विमानाने जाण्यासाठी 12 ते 13 हजार रुपये किमान खर्च येतो. तेथील हॉटेलचे भाडे 2 हजार रुपयापासून सुरू होते. एका दिवसाचा खाण्याचा खर्च 500 ते 1000 रुपये येऊ शकतो. पर्यटनस्थळांना भेटीसाठी 2000 रुपये व पाण्यातील साहसी क्रीडा प्रकारांसाठी दिवसाला 3 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. मग हिशोब केल्यास जोडीदाराला दिवसाला 8 हजारपर्यंत खर्च येऊ शकतो. म्हणजेच मालदिवपेक्षा निम्या खर्चात भारतीयांना लक्षद्वीपचा आनंद घेता येतो. सदरच्या लक्षद्वीपमध्ये ठिकाणी रस्ते नाहीत, गावही नाहीत, हे लक्षात घ्यावे लागेल. केवळ हवाई मार्गे किंवा समुद्री वाहतुकीमार्गे येथे पोहचता येते. त्याठिकाणी तंबू त्याचप्रमाणे रिसॉर्ट्स यांची संख्या समुद्र किनारी पाहायला मिळते. केवळ 10 ते 15 पर्यटकच या ठिकाणी भेट देतात, अशीही माहिती समोर आली आहे. याठिकाणी जाण्यासाठी भारतीयांना व्हिजाची गरज लागत नाही. लक्षद्वीपमध्ये मिनीकॉय आयलँड, कवरत्ती व कदमट आयलँड ही तीन महत्त्वाची समुद्र पर्यटनाची सुंदर स्थळे आहेत. यामधील काही समुद्र किनाऱ्यांवर स्कूबा डायव्हिंगसह स्नॉर्कलिंग यासह साहसी क्रीडा प्रकारांचा आनंद पर्यटकांना घेता येतो. पांढऱ्या वाळूचे समुद्र किनाऱ्यांचे लक्षद्वीप पर्यटकांना पुन्हा पुन्हा यायला भाग पाडत असते. जवळपास 35 बेटांचा 32 चौरस कि. मी. क्षेत्रफळाचा लक्षद्वीप हा भाग आहे. मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश यांच्या एकत्रित चौरस कि. मी. प्रदेशाएवढा लक्षद्वीप आहे. कोचीहून हे ठिकाण जवळपास 398 किलोमीटर अंतरावर आहे. हनीमुनला जाणाऱ्यांसाठी हे एक अत्यंत आवडीचे ठिकाण आहे. सप्टेंबर ते मे महिना या कालावधीत या बेटाला भेट देता येते. 22 ते 36 डिग्री सेल्सियस एवढे तापमान सरासरी या बेटावर असते.