क्रिकेटप्रेमी क्रीडारसिकांची यंदाची दिवाळी अत्यंत उत्साहात जाणार आहे. कारण ऐन दिवाळीच्या काळात ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकातील भारताच्या सामन्यांची सुरुवात होत आहे. भारताची पहिलीच लढत पाकिस्तानशी असून आशिया चषकातील पराभवाचे उट्टे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ नक्कीच काढेल यात शंका नाही. मुख्य मुद्दा आहे तो जेतेपदाचा. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात एकाही यजमान संघाला जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे या स्पर्धेतील तुल्यबळ संघ असलेला आणि गतवेळचा विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया यंदा हा इतिहास मोडतो का हे पहावे लागेल. परंतु टीम इंडियाचा फॉर्म पाहता 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखाली मिळवलेल्या अजिंक्यपदाची पुनरावृत्ती टीम रोहित करेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
कॅरी पॅकर यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या ट्वेंटी-20 संकल्पनेने पाहता पाहता क्रिकेटविश्वावर आपला वरचष्मा निर्माण केला आहे. पाच दिवस चालणारे कसोटी सामनेच नव्हे तर पन्नास षटकांचे एकदिवसीय क्रिकेट सामनेही आता क्रिकेटप्रेमींना कंटाळवाणे वाटू लागले आहेत. 20 षटकांत होणाऱया तुफान फटकेबाजीची आणि त्यादरम्यान पदोपदी ताणल्या जाणाऱया उत्कंठेची क्रिकेटरसिकांना जणू झिंगच चढली आहे. तशातच विश्वचषक स्पर्धेच्या काळात तर ही झिंग पराकोटीला पोहोचते. यंदाच्या दिवाळीच्या सुटय़ांच्या काळात याची अनुभूती पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाकडे टी-20 विश्वचषकाचे यजमानपद आले असल्यामुळे या स्पर्धेतील जेतेपद टिकवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. गतवेळच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला होता. यंदा ऑस्ट्रेलियन संघामध्ये सिंगापूरमध्ये जन्मलेला टीम डेव्हिड हा अष्टपैलू खेळाडू, सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श आणि वेगवान गोलंदाज हॅझलवूड हे गतवेळच्या स्पर्धांमध्येही सहभागी होते. परंतु ऑस्ट्रेलियापुढे मुख्य चिंता आहे ती कर्णधार ऍरोन फिंच याच्या हरवलेल्या फॉर्मची! वास्तविक, टी-20 स्पर्धांच्या गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात एकाही संघाला सलग दुसऱयांदा अजिंक्यपद पटकावता आलेले नाही. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिका, 2009 मध्ये इंग्लंड आणि 2010 मध्ये वेस्ट इंडिजने या स्पर्धांचे यजमानपद सांभाळले होते. परंतु दुसऱया फेरीतच या संघांना बाहेर व्हावे लागले होते. इतकेच नव्हे तर विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणाऱया यजमान देशालाही विजेतेपद पटकावता आलेले नाहीये. हा इतिहास यंदाही कायम राहणार की बदलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
क्रिकेटविश्वात गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रमाणात पैसा आला आहे. आयपीएल स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या लिलावावर लावली जाणारी बोली पाहून याचा सहज अंदाज येतो. दुसरीकडे स्पर्धांमधून देण्यात येणारी बक्षिसाची रक्कमही प्रचंड वाढली आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा विचार करता तब्बल 468 कोटी रुपयांची बक्षिसे वाटण्यात येणार आहेत. स्पर्धा जिंकणाऱया संघाला 13.17 कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला 6.60 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीमध्ये पराभूत होणाऱया दोन्ही संघांना प्रत्येकी 3.30 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
ऑस्ट्रेलियातील सात शहरांमध्ये या स्पर्धेतील सामने खेळले जात आहेत. जवळपास महिनाभर चालणाऱया या क्रिकेटच्या महासंग्रामाची 13 नोव्हेंबर रोजी होणाऱया महाअंतिम सोहळ्याने सांगता होणार आहे.
भारतीय संघासाठी हा विश्वचषक अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली 2007 मध्ये पहिलाच विश्वचषक जिंकून समस्त भारतीय क्रिकेटरसिकांना शानदार भेट दिली होती. त्यावेळच्या संघात सहभागी असणारा रोहित शर्मा 15 वर्षांनंतर कर्णधाराच्या भूमिकेतून भारतीय संघाची धुरा सांभाळत आहे. 2016 मध्ये भारताने उपांत्य फेरीपर्यंत प्रवेश केला होता. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱया पाकिस्तानशी होणार आहे. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान टीम इंडियाला विराट कोहली आणि सूर्यकुमार यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. विराट कोहलीने टी-20 विश्वचषक स्पर्धांमधील 21 सामन्यांमध्ये अर्धशतकाहून अधिक धावा काढण्याची कामगिरी केली आहे. विराटचा स्ट्राईक रेट 129.60 इतका राहिला आहे. तसेच मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवरही सर्वांची नजर असणार आहे. गेल्या दहा दिवसांपासून मोहम्मद शमी खूप मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. सूर्यकुमार सध्या तुफान फॉर्ममध्ये असून मधल्या फळीतील खिंड एकहाती लढवण्याची किमया तो याही स्पर्धेमध्ये दाखवेल, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. सूर्यकुमारचा आत्मविश्वास हा मैदानावरील सर्वच खेळाडूंना विलक्षण भावणारा आहे. या आत्मविश्वासाच्या जोरावरच तो आपल्यातील कौशल्यांचा अत्यंत खुबीने वापर करत असतो. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाला सर्वाधिक उणीव जाणवणार आहे ती जसप्रित बुमराहची. दुखापतीमुळे बुमराहला हा महासंग्राम मैदानाबाहेर बसून बघावा लागणार आहे.
बुमराह बाहेर असल्यामुळे आजघडीला भारतीय संघाची सर्वांत मोठी कमकुवत बाजू कोणती असेल तर ती वेगवान गोलंदाजी. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यात यामुळे अपयश येत आहे. शमीकडून मोठय़ा अपेक्षा असल्या तरी तो कोरोनातून बरा होऊन आलेला असल्यामुळे काही मर्यादा येतात का, हे पहावे लागेल. अर्थात दुसऱया बाजूला भारताची फलंदाजीची बाजू भक्कम दिसत आहे. रोहित शर्मा, केएल राहुल हे आज जगातील सर्वांत प्रभावी सलामी फलंदाज म्हणून ओळखले जात आहेत. विराट कोहलीचाही गवसलेला फॉर्म आता परतताना दिसला आहे. ऑलराऊंडर असणारा हार्दिक पंडय़ा हा कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देऊ शकतो, हे गेल्या काही सामन्यांमधून दिसून आले आहे. आर. अश्विन आणि यजुवेंद्र चहल यांसारखे उत्कृष्ट दर्जाचे स्पिनर भारतीय संघामध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर भारतीय संघाची कामगिरी दमदार राहिली आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकारांचा विक्रम युवराजसिंगच्या नावावर आजही कायम आहे. युवराजने 33 षटकार झळकावले होते. युवराजला मागे टाकण्यासाठी रोहित शर्माला अवघ्या तीन षटकारांची आवश्यकता आहे. दुसरीकडे या विश्वचषकात एक हजार धावांचा टप्पा पार करण्याची संधी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आहे. रोहितने आतापर्यंत विश्वचषकाच्या 33 सामन्यात आठ अर्धशतकांसह 847 धावा केल्या आहेत; तर विराटने 21 सामन्यांमध्ये दहा अर्धशतकांसह 845 धावा केल्या आहेत. एकंदरीत पाहता भारतीय संघ 2007 ची पुनरावृत्ती घडवून आणेल, अशी दाट शक्यता आहे.
या विश्वचषकातील भारताची पहिली लढत होत असलेल्या पाकिस्तानचा विचार करता कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान ही सलामीची जोडी त्यांचे सर्वांत मोठे शक्तिस्थान आहे. परंतु मधल्या फळीमध्ये पाकिस्तानकडे तुलनेने दमदार फलंदाज नाहीये. शाहीन शाह आफ्रिदीची वेगवान गोलंदाजीही भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकते. आशिया चषक स्पर्धेतील दोन सामन्यांपैकी एका सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचे उट्टे काढून भारत पहिल्याच तडाख्यात पाकिस्तानला चारीमुंडय़ा चित करेल, अशी अपेक्षा आहे.