मुळ सौंदर्य टिकवुनच विकास महत्वाचा… कोटीच्या टेंडरला आले महत्व
कोल्हापूर/सुधाकर काशीद
आज रंकाळा तलाव हे आज जरूर एक सौंदर्य स्थळ आहे. पण तो एक नैसर्गिक जलसाठा आहे. या रंगाने कोल्हापूर शहराला एक काळ पाणीपुरवठा केला आहे. रंकाळ्याची चौपाटी म्हणून ज्यावरून आपण फिरतो तो एक पक्का बंधारा आहे हे आपण विसरलो आहे. त्यामुळे रंकाळा सर्वांचाच आहे. पण त्याचे फारसे महत्त्व बहुतेकांना वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे. रंकाळ्यावर जे काही चाललंय ते ठराविक रंकाळाप्रेमी बघून घेऊ देत अशीच जणू कोल्हापूरकरांची भूमिका आहे. त्यामुळे रंकाळ्याचा विकास कोटीच्या पटीतील टेंडरवर अवलंबून आहे. रंकाळा आम्हा कोल्हापूरकरांचा आणि तो वाचवायचा ही जाणीव या कोटीच्या टेंडरपेक्षा या क्षणी महत्वाची आहे. सकाळ सकाळी काखेत टॉवेलची उरळी घेऊन रंकाळ्यावर आंघोळीला जाणाऱया बरोबरच रंकाळ्याचा जैवशास्त्राचा वास्तुशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यापर्यंत सर्व घटकांचा सहभाग त्यासाठी आवश्यक आहे.
रंकाळा जरूर एक जलसाठा आहे. पण तो कोल्हापुरच्या दैनंदिन जीवनाचा एक विभाज्य अंगही आहे अनेकांना माहित नाही. रंकाळ्यावरून पाईपलाईन घालून शहराला एक काळ पाणीपुरवठा होत होता. अर्थात त्यावेळी शहर छोटे होते. त्या पाणीपुरवठय़ाचा एक जिवंत पुरावा आजही जिवंत आहे. उभा मारुती चौकात एक 24 तास वाहणारा नळ रंकाळ्याचा आहे. मारुतीच्या देवळासमोर उभे राहून दक्षिणेकडे पाहिली की रस्त्यापलीकडे 24 तास खळखळ वाहणारे पाणी रंकाळा तलावाचेच आहे. त्याचा एक हौद निवृत्ती चौकात आजही आहे.
रंकाळ्यातला टिलाप मासा म्हणजे एरवी एक भाकरी खाणारा या माशाच्या कालवणासोबत दोन भाकरी खाणार अशा चवीचा आहे. अनेकजण आजही तलावाच्या काठावर गळ टाकून बसतात. रात्रीच्या कालवणासाठी रंकाळ्यातलाच टिलाप मासा नेतात. या तलावाचे पाणी खराब झाल्यामुळे आता रंकाळ्यात फारसे कोणी पोहत नाही. पण राजघाटावर उडी मारली की पांढऱ्या घाटावरच थांबायचे. असे पोहतच या परिसरातल्या कित्येक पिढय़ा मोठय़ा झाल्या आहेत. रंकाळ्याचे पाणी जड आणि या पाण्यात सहज पोहणारे इतर कसल्याही पाण्यात अलगद पोहू शकतात अशी ओळख आहे.
नैसर्गिक रंकाळा तलावाला साध्या पद्धतीने सौंदर्याची जोड महापालिकेचे पहिले प्रशासक द्वारकानाथ कपूर यांनी दिली. ते होते म्हणून चौपाटी तरी उभी राहिली. आज या जुन्या चौपाटीची अवस्था अतिशय भकास आहे. चा पाटीवर कुठेतरी लाईट आहे, नाहीतर सारा अंधारच आहे. फरशा उखडल्या गेल्या आहेत.
या तलावाचे सुशोभिकरण करण्यापेक्षा संवर्धन खूप महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात रंकाळा भरला की अतिरिक्त पाणी बाहेर पडण्यासाठी एक वाट (सांड) होती. त्यामुळे रंकाळा भरून कधी ओव्हरफ्लो झाला नाही. अलीकडे मात्र तीन वेळा रंकाळा ओव्हर फ्लो झाला आहे. अक्षरशः हतबल होऊन कट्टय़ावरून खाली वाहू लागला. वास्तविक रंकाळा भरून तो वाहू लागणे म्हणजे धोक्याचा मोठा संकेत. पण कोल्हापुरात रंकाळा ओव्हर फ्लोचा तो क्षण जत्रेसारख्या उत्साहात कोल्हापूरकरांनी अनुभवला.
अशा रंकाळा तलावाभोवती स्वच्छ सुंदर वातावरण तयार करणे, तलावात मिसळणारे सांडपाणी रोखणे, तलावा भोवती निसर्ग पूरक वॉक वे तयार करणे. लाईटचे कलात्मक खांब उभे करणे, साजेसे लँडस्केप करणे, बैठक व्यवस्था परिपूर्ण करणे, खाऊ गल्लीला सक्तीची शिस्त लावणे आणि रंकाळा सर्व कोल्हापूरकरांचा आहे. तो कोणी दहा-बारा वजनदार टेंडर दादांचा नाही एवढी जाणीव करून देणे या क्षणी गरजेचे आहे. आणि कदाचित तलाव तलावातले पाणी पाण्यातली जलचर व काठावरचे पक्षी यांनाही तेवढेच अपेक्षित आहे.