मुला-बाळांनी सांडलेले खाद्यपदार्थ व भाजी बटाटय़ाचा टाकाऊ भाग म्हणजे ओला व सुका कचरा स्वतंत्र ठेवून परस-बागेतल्या झाडांना टाकत रहावे. प्लास्टिकच्या पिशवीत भरु नये आणि गोव्यात गार्बेजची निर्मिती करु नये. गार्बेज या शब्दाचा शब्दकोषातील अर्थ घरातला ओला व सुका कचरा.
गोवा राज्यातल्या काणकोणपासून पेडण्यापर्यंतच्या माता-भगिनींनी रस्त्याच्या कडेला टाकलेल्या, सोनसडय़ावर, साळगाव पठारावर, गणेशपुरीत नेऊन टाकण्यास कचरा गोळा करणाऱयाकडे दिलेल्या कचऱयात प्लास्टिक असते व प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरूनच दिलेला असतो. प्लास्टिकच्या पिशव्यांत भरून रस्त्याच्या कडेला टाकलेल्या पिशव्या गायी, कुत्रे दातांत धरून रस्त्यावर आणून दातानेच फोडण्याचा प्रयत्न करताना प्लास्टिकचे अवशेष गायी-वासरांच्या, कुत्र्यांच्या पोटात जाऊन बसतात. साळ नदीत प्लास्टिकच्या पिशव्यांत भरून टाकलेला कचरा आतल्याआत कुजतो, प्रदुषणयुक्त द्रव्याची निर्मिती होते. फुगे तरंगतात व फुटतातही. तो प्लास्टिकयुक्त घरकचरा खाण्याचा प्रयत्न करताना प्लास्टिकचे अवशेष खेकडय़ाच्या, माशांच्या शरीरात बसतात. ते मासे, खेकडे उमेदीने खाणाऱया माता-भगिनींच्या मुलांच्या पोटात जातात. कर्करोगासारखे रोग होण्याचा संभव असतो. यावर एकमेव उपाय म्हणजे घरकचरा.
स्वयंपाक घरातला असो किंवा परसबागेतला ओला असो वा सुका. मुलांनी सांडलेले खाद्यपदार्थ असो वा भाजी. बटाटय़ाचा टाकाऊ भाग प्लास्टिकच्या पिशव्यांत भरू नका. अलग ठेवा. प्रत्येक दिवशीचा स्वयंपाक घरातला असा हा कचरा क्रमाक्रमाने परस बागेतल्या तुम्हीच लावलेल्या झाडांत टाका. देवाला वाहिलेली फुले दुसऱया दिवशी काढून समोरच्या फुलझाडांत टाका. त्या निर्माल्याचा आदरही केला जाईल व त्या झाडांना खतही मिळेल. निर्मळ प्लास्टिक, दही-दुधाच्या पिशव्यासुद्धा धुऊन निर्मळ करा व एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून पंचायत किंवा नगरपालिकेकडे सोपवा. हाच तो प्रतिबंधात्मक उपाय.
सोनसडय़ावरील कचऱयाला आग लागते. प्रदूषण निर्मिती होते. प्लास्टिकच्या पिशवीत भरलेला घरकचरा साळगाव पठारावर नेताना ट्रकमधून प्रदूषित पाणी झिरपते व पाठीमागून येणाऱया वाहनचालकांना असो वा चालत डोंगर माथ्यावर जाणाऱयांना श्वास घेणे कठीण होते. गणेशपुरीत टाकलेल्या प्लास्टिकयुक्त कचऱयाचे विलगीकरण करताना मजूर लोक थकतात पण घर कचऱयामध्ये मिसळलेले प्लास्टिक अलग करता येत नाही. प्लास्टिकमिश्रीत घरकचरा एकत्र करून सोनसडय़ावर टाकणाऱया उद्योजकाला लाखो रुपयांचा दंड भरण्याचा आदेश जातो. घर कचऱयापासून सेंद्रिय खत निर्मिती करून भातशेतीलाही व परस बागेलाही आधार देण्याची आम्हा गोवेकरांची परंपरा. पण प्लास्टिक मिश्रीत घर कचऱयाचे खत-खड्डय़ांचा वापर करून सेंद्रिय खत निर्मितीस गोवेकरांचा विरोध. माता-भगिनी घर कचरा प्लास्टिकच्या पिशवीत भरतात व आपल्या नवऱयाच्या किंवा मुलाच्या हातात देऊन नदीत टाकायला सांगतात.
माता-भगिनींना जीवनभर आनंद मिळवून सुख-समाधानाने जगण्यास आधार मिळवून देते. ही पृथ्वी दोन तृतियांश पाण्याने व्यापलेली व एक तृतियांश जमिनीची. माणसासाठी व जनावरांसाठी म्हणजे सजीवांसाठी आवश्यक. जमीन वाढत नाही पण सजीवांची संख्या दैनंदिन वाढते. 1987 साली सात लाख लोकसंख्येचा गोवा प्रदेश आज सतरा लाखांचा झाला आहे. सजीवांना जगण्यास हवा, पाणी व सूर्यप्रकाश गरजेचा. गोवा राज्यातील एक तृतियांश जमिनीवर झाडे लावली, वाढविली व टिकविली तरच सजीवांना जगण्यास आवश्यक हवा, पाणी व सूर्यप्रकाश मिळतो. सूर्यप्रकाश मिळतो म्हणूनच झाडांच्या हिरव्यागार पानांपासून ऑक्सिजनची निर्मिती होते. पुढे झाडांमुळे ढग अडवले जातात आणि पाऊस पडतो. परसबागेतच पिकविलेल्या वांग्याचे भरीत रुचकर करण्यासाठी व सेंद्रिय खताचा वापर करून वाढविलेली भाजी खाण्याची उमेद वाढविण्यासाठी हा घरगुती उपक्रम माता-भगिनीच करू शकतात. त्याच ‘घरकान्नी’, घर कचऱयाची निर्मिती करणाऱया व त्याच घर कचऱयाच्या सेंद्रिय खताचा वापर करून भाजी-बटाटय़ाची निर्मिती करणाऱया.
वाढत्या लोकसंख्येच्या गोवा राज्यात हवा, पाणी व ऑक्सिजनची गरज दैनंदिन वाढते आहे. एक तृतियांश जमिनीवर असलेली झाडे टिकवून ठेवणे गरजेचे आहे. म्हणून मोपा विमानतळासाठी पाच हजार झाडांसाठी पंधरा हजार झाडे लावली पाहिजेत, ही नैसर्गिक नियमाची अट आहे. त्याचपद्धतीने वाढत्या लोकसंख्येची दैनंदिन गरज धातू व लाकूड या नैसर्गिक साधनाच्या वस्तूंऐवजी प्लास्टिकची साधने वापरण्याचा पर्याय शास्त्रज्ञाने शोधून काढला आहे व आम्हा सजीवांना आधार दिला आहे.
प्लास्टिक हे एक असे साधन आहे की, खुर्च्या-बादल्यांची निर्मितीही होते व चाळीस मायक्रॉनपासून दोनशे मायक्रॉनपर्यंतच्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या अवशेषांची पुनर्निर्मितीही होते. झाडेही तोडावी लागत नाहीत (रात्रीही व दिवसाही) खनिज संपत्तीही वापरावी लागत नाही. फक्त गरज आहे ती माता-भगिनींच्या परंपरागत प्रतिबंधात्मक उपायांची कारण त्या किचन गार्डनच्या निर्मात्या म्हणून व राखणदार म्हणून वावरतात व त्या आधारे आपल्या मुला-बाळांबरोबरच गाई-गुरांनाही जगण्याचा आधार देतात.
– राया नरहरी नाईक, पर्वरी