सत्ताधारी आमदारों सभागृहात आवाहन
प्रतिनिधी / पणजी
म्हादई विषयावर सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. कुठल्याही विषयावर विरोधक राजकारण करण्याचा प्रयत्न करातत, मात्र म्हादई हा विषय सर्वांच्यात जिव्हाळ्याचा असून या विषयावर राजकारण करण्यापेक्षा सर्वानी एकत्र येऊन हा विषय सोडविणे काळाची गरज असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
इतके दिवस या विषयावर आपण बोललो नाही कारण मुख्यमंत्री जे काही म्हादई वाचविण्यासाठी करीत आहेत त्याच्यावर आपला विश्वास आहे. शिवाय केंद्रात सरकार आमचेच असल्याने केंद्र सरकार आमचा विश्वास घात करणार नाही. आम्हाला न्याय नक्कीच मिळेल. त्यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
म्हादईचे पाणी कर्नाटकाने वळविल्यास गोव्यातील इतर भागात त्याचे नुकसान होईलच मात्र सर्वार्त जास्त नुकसान सत्तरी डिचोली तालुक्याला होणार आहे याचीही आम्हाला कल्पना आहे. विरोधक केवळ आम्हाला बदनाम करण्यासाठी किंवा आम्हाला कमीपणा दाखविण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी सभा घेत आहेत. मात्र साखळीत झालेल्या सभेत साखळी किंवा सत्तरीचे लोक नव्हते तर ते भाडय़ाचे लोक आणले होते अशी टीका विश्वजीत राणे यांनी करताना काँग्रेसवर तुटून पडले.
काँग्रेसचे हायकमांड नेते कर्नाटकाच्या बाजूने बोलतात ते म्हणतात कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यास कोटय़ावधी रुपये खर्च करून गोव्याचे पाणी कर्नाटकात वळवू तर गोव्यातील काँग्रेसचे नेते कर्नाटकाला पाणी वळवू न देण्याची नाटके करीत आहे. लोकांनी कोणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे असेही विश्वजीत राणे म्हणाले.
प्रत्येकाकडून पोळी भाजण्या प्रयत्न : साळकर
आज म्हादई विषयावरून प्रत्येक पक्ष आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल सभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. जणू भाजप सरकारने गोव्याचे वाटोळे केले आहे असे भासविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र वस्तूस्थिती काही वेगळीच आहे. असे वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले.
म्हादई बाबत गोवा सरकारला खूप काळजी असून त्यासाठी जे काही प्रयत्न करायला हवे ते सरकार वेळेवेळी करीत आहे. म्हादई विषयावरून सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला जाण्याचे ठरले असता केवळ भाजप आमदार सोडून एकही आमदार का आला नाही असा प्रश्न दाजी साळकर यांनी उपस्थित केला. आजही वेळ गेलेली नाही म्हादई वाचवायची असल्यास सर्वंनी एकजूट रहाणे गरजेचे आहे असे दाजी साळकर यांनी सांगितले.
वेळ राजकीय खेळ खेळण्याची नव्हे दिव्या : राणे
आज म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटक सरकार युध्द पातळीवर तयारी करीत आहे. गोव्यातील राजकीय पक्ष राजकारणाचे खेळखेळत आहे. विरोधक सत्तधारी पक्षाला कसे खाली खेचता येईल त्यासाठी प्रयत्न करीत आहे. ही वेळ राजकीय खेळ खेळण्याची नव्हे तर एकजूटीने काम करून म्हादई वाचविण्याची आहे. असे दिव्या राणे यांनी सांगितले.
वाद चव्हाटय़ावर घालून आईचा बळी देऊ नका : डॉ. शेटय़े
म्हादई आमची आई आहे. आमच्या आईला वाचविण्यासाठी एकजूटीने काम करूया. घरातील वाद चव्हाटय़ावर घालून आईचा बळी देऊ नका. म्हादईचे पाणी कर्नाटकाने वळविल्यास आमच्यावर मोठे संकट येईल असे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े यांनी सांगितले. कर्नाटक इतर राज्यातील पाणी आपल्याकडे वळवून घेण्यास माहिर आहे. त्यांना त्याच्यातील सगळे डावपेच माहित आहे. या अगोदर त्यांनी तामीलनाडूचे पाणी वळविले आहे. आता त्यांचा गोव्याच्या पाण्यावर डोळा आहे. त्यामुले वेळीच सावध होणे गरजेचे आहे. अजून वेळ गेलेली नाही सर्वांनी एकजूटीने कम करून म्हादई वाचवूया असे ही डॉ. शेटय़े म्हणाले.