प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी नगरयोजना विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंटमधील नागरी वसाहत महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव संरक्षण खात्याने तयार केला आहे. याबाबत महापालिकेला पाठविलेले पत्र गुरुवारी पोहोचले आहे. सदर पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. पण पुढील कार्यवाहीसाठी नगरयोजना विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी वसाहत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय संरक्षण खात्याने घेतला आहे. यापूर्वी महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यातील कॅन्टोन्मेंटबाबत राज्य शासनाला पत्र पाठवून हस्तांतराबाबत मते विचारण्यात आली होती. मात्र बेळगाव कॅन्टोन्मेंटसंदर्भात कोणतेच पत्र आले नव्हते. संरक्षण खात्याने सप्टेंबर महिन्यात कर्नाटक शासनाला पत्र पाठवून बेळगाव
कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी वसाहत हस्तांतर करून घेण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे सदर प्रस्ताव नगरविकास खात्याने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर पत्र डीयूडीसी विभागामार्फत महापालिकेला पाठविले आहे. तब्बल 20 दिवसांनंतर हे पत्र महापालिकेला पोहोचले आहे.
कॅन्टोन्मेंटमधील नागरी वसाहतीमध्ये 20 हजार लोकसंख्या असून हस्तांतराच्या मुद्द्यावर सभागृहात निर्णय घेतला जाणार आहे. तत्पूर्वी नागरी वसाहतीमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा, रस्ते, गटारींची माहिती घेतली जाणार आहे. तसेच कॅन्टोन्मेंटला मिळणाऱ्या महसुलाचा तपशील घेऊन हा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महापालिकेला मिळालेले पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आले होते. सदर पत्र नगरयोजना विभागाला देण्यात आले आहे. त्यामुळे पुढील कार्यवाहीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.