परवाना पुन्हा मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
प्रतिनिधी /मडगाव
काराय-शिरोडा येथील श्री कामाक्षी देवी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा परवाना केंद्रीय भारतीय औषध परिषदेने रद्द केला आहे. त्यामुळे या होमिओपॅथिक कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱया असंख्य विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली आहे. होमिओपॅथिक कॉलेज चालविण्यासाठी जे निकष घातलेले आहेत. त्याची पूर्तता होत नसल्याने कॉलेजचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षात पुन्हा परवाना मिळावा यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक तसेच या कॉलेजचे प्रमुख तथा जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर हे प्रयत्नशील आहेत. केंद्रीय भारतीय औषध परिषदेने देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा उंचावण्यावर भर दिलेला आहे. त्यासाठी अनेक निकष घालून दिलेले आहेत. जर हे निकष (अनुपालन) पूर्ण होत नसेल तर वैद्यकीय महाविद्यालयाचे परवाने रद्द केले जातात. त्यात कामाक्षी होमिओपॅथिक कॉलेजचा परवाना रद्द झालेला आहे.
रद्द करण्यात आलेला परवाना पुन्हा मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे. यंदा परवाना मिळू शकतो, पण अद्याप काहीच कळलेले नाही असे कामाक्षी होमिओपॅथिक कॉलेजचे प्रमुख सुभाष शिरोडकर म्हणाले. आत्ता परवाना मिळाला तरी जेमतेम 10 ते 15 विद्यार्थी मिळू शकतील. त्यामुळे आपण सुद्धा हा विषय तसा लावून धरलेला नाही असे श्री. शिरोडकर म्हणाले.
कोणतेही महाविद्यालय आर्थिक दृष्टय़ा सक्षम असले पाहिजे. कमीत कमी 100 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला पाहिजे. कामाक्षी होमिओपॅथिक कॉलेजमध्ये 50 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ही संख्या वाढून 100 करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसल्याचे श्री. शिरोडकर म्हणाले. विद्यार्थ्यांची नीट परीक्षा होणे बाकी आहे. त्यानंतर निकाल होईल व त्यावेळी जर 100 विद्यार्थी मिळत असेल तर मोठी समस्या दूर होईल असे ही श्री. शिरोडकर म्हणाले. जर अपेक्षित विद्यार्थी मिळाले नाही तर संस्थेला दर वर्षी 50 लाख ते एक कोटी रूपये खर्च करावे लागतात. याची कल्पना कुणालाच नसते. कॉलेज -कॉलेज म्हटले म्हणून होत नाही. इतर बाबी जाणून घेणे तेव्हढेच महत्वाचे असते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जर 100 विद्यार्थी मिळाले नाही तर दर वर्षी एक कोटी रूपये खर्च करणे सहजसाध्य होणारी गोष्ट नाही. 50 विद्यार्थी घेऊन कॉलेज चालविणे शक्यच नसल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात शिक्षकांना सर्वाधिक पगार दिला जातो. तशी परिस्थिती देशात अन्य ठिकाणी नाही. त्यामुळे 50 विद्यार्थी घेऊन आर्थिक ताळमेळ जुळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुभाष शिरोडकर हे आज भाजप सरकारात मंत्री आहेत. त्यामुळे सरकारने या कॉलेजला मदतीचा हात देऊन गोव्यातील विद्यार्थ्यांना होमिओपॅथिक शिक्षणाचे दरवाजे खुले करावेत अशी मागणी विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांकडून होत आहे.