प्रत्येकी 1.75 लाखांचा दंड दोघांची यापूर्वीच निर्दोष मुक्तता
प्रतिनिधी /पणजी
ताळगाव येथील हसन खान खूनप्रकरणी सत्र न्यायालयाने 5 आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिवाय प्रत्येकी रु. 1.75 लाख दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे.
या खून खटल्यातून सत्र न्यायालयाने यापूर्वी रॉबर्ट गोन्साल्वीस व शिवाजी पाटील या दोघांची निर्दोष मुक्तता केली होती. तथापि उर्वरित 5 आरोपी अभिनंदन राज पटेल, अनिल भोईस, रवी पाटील, अरुण पाटील, अनिकेत मल्लूरकर यांना मात्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आरोपींची शिक्षा कमी असावी, अशी याचना न्यायालयाकडे करण्यात आली होती. या उलट सरकारी वकिलांनी त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्यामुळे आरोपींची याचना न्यायालयाने फेटाळून लावली व जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
9 वर्षांपूर्वी झाला होता खून
सुमारे 9 वर्षांपूर्वी हा खून झाला होता. आता एवढय़ा कालावधीनंतर निकाल लागला आहे. या खून प्रकरणात अनेक लोकांचे जबाब नेंदविण्यात आले होते. विविध कारणांमुळे खून करण्याच्या आरोपाखाली त्या संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सर्व संशयित गेली अनेक वर्षे न्यायालयीन कोठडीत होते.