दहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
प्रतिनिधी/ बेळगाव
शेताच्या हद्दीवरून वारंवार वाद होत होता. यातच पिकाला पाणी देत असताना वाद झाल्यानंतर एकाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची घटना चचडी (ता. सौंदत्ती) येथे घडली होती. या खटल्याची सुनावणी येथील दहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये झाली. त्यामुळे खून करणारा आरोपी दोषी आढळल्याने त्याला न्यायालयाने जन्मठेप आणि 2 लाख 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
शिवानंद बिराप्पा कुरबर (रा. चचडी, ता. सौंदत्ती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शिवानंद आणि मयत शंकराप्पा सननिंगाप्पा कुरबर यांचे शेत लागूनच आहे. त्यांच्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद होता. दि. 29 डिसेंबर 2015 रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास जोरदार वाद झाला. त्यानंतर आरोपी शिवानंद याने शंकराप्पावर कुऱ्हाडीने सहा वार केले. यावेळी अडविण्यासाठी मयत शंकराप्पा याची बहीण सावित्री सननिंगाप्पा कुरबर ही गेली असता तिला सिद्दव्वा बिराप्पा कुरबर हिने अडवून धरले.
या हल्ल्यामध्ये शंकराप्पाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याची बहीण सावित्री कुरबर हिने मुरगोड पोलीस स्थानकात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपींवर भादंवि 447, 302, 341, 109, सहकलम 34 अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये साक्षी व पुरावे तपासण्यात आले. त्यामध्ये शिवानंद हा दोषी आढळला तर सिद्दव्वा हिच्यावर गुन्हा सिद्ध करता आला नाही. शिवानंदला न्यायाधीश गुरुराज गोपाळचार्य शिरोळ यांनी जन्मठेप आणि दंड ठोठावला आहे. सरकारी वकील म्हणून आर. ए. बारावली यांनी काम पाहिले.