ओपीडीमध्ये तासन्तास प्रतीक्षा करण्याची वेळ, आर्थिक दुरवस्थेमुळे हॉस्टेलमध्ये निवास
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे दिग्गज तिरंदाज व देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित लिंबा राम मागील 5 वर्षांपासून आजारी आहेत. मागील 3-4 महिन्यापासून तर ते राजधानीतील जीबी पंत इस्पितळात दाखल आहेत. 1995 राष्ट्रकुल तिरंदाजी इव्हेंटमध्ये सांघिक व वैयक्तिक गटातील सुवर्ण, 1989 बीजिंग आशियाई स्पर्धेत सांघिक सुवर्ण, वैयक्तिक गटात रौप्य जिंकणाऱया अर्जुन पुरस्कार जेत्या या दिग्गज तिरंदाजाची आता मात्र बरीच परवड होत राहिली आहे.
एकवेळ लिंबा राम हे केवळ तिरंदाजीत नव्हे तर एकंदरीत भारतीय क्रीडा वर्तुळात अव्वल खेळाडूंपैकी एक होते. 1992 बार्सिलोना ऑलिम्पिकमधील एलिमिनेटर फेरीत ते चौथ्या स्थानी राहिले. 1996 मध्ये ते आशियाई विक्रमासह राष्ट्रीय विजेते ठरले. मात्र, काही वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका येऊन गेल्यानंतर विविध आजारांनी जणू त्यांचा पिच्छा पुरवला. यंदा त्यांना हृदयविकाराचा झटका आला. स्टेन्ट घालावे लागले आणि या इलाजादरम्यान त्यांना हर्निया असल्याचे निष्पन्न झाले. सध्या त्यांची इतकी बिकट स्थिती झाली आहे की, ते स्वतःच्या बळावर चालूही शकत नाहीत. इतकेच नव्हे तर बोलूही शकत नाहीत.
आर्थिक दुरवस्थेमुळे ते जवाहरलाल नेहरु स्टेडियमच्या हॉस्टेलवर राहिले असून खासगी इस्पितळात उपचारासाठी पैसे नसल्याने ते सरकारी इस्पितळावर सर्वस्वी अवलंबून आहेत. लिंबा राम यांनी आपल्या उमेदीच्या कालावधीत भारताचे नाव प्रकाशझोतात आणले. पण, आता त्यांना सरकारी इस्पितळातील ओपीडीमध्ये तासन्तास रांगेत बसावे लागत आहे. शनिवारी त्यांना पंत इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात येणार होता. पण, पुन्हा डॉक्टरांना भेटायचे असेल तर पुन्हा त्यांना ओपीडीच्या लांबच लांब रांगाचे सोपस्कार पार पाडावे लागतील.
लिंबा राम यांना कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही. मात्र, पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्काराने सन्मानित असल्याचे ओळखपत्र प्रदान केले जावे, जेणेकरुन इस्पितळातील लांबच्या लांब रांगा टाळता याव्यात, इतकी अपेक्षा त्यांच्या निकटवर्तियांनी व्यक्त केली आहे.