प्रतिनिधी/ सातारा
महाराष्ट्रामध्ये ऊसाला गुजरातप्रमाणे 3500 रुपये प्रति टन दर मिळाला पाहिजे. महाराष्ट्रातील कारखानदारच सरकारमध्ये असल्यामुळे आणि महाराष्ट्रात एफ. आर. पी. चा कायदा असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱयांना प्रति टन 2900 रुपये दरावरच समाधान मानावे लागत आहे. गुजरातप्रमाणे दर मिळावा, यासाठी शेतकरी संघटना उठाव करणार आहे, तसा ठराव शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका शेतकरी संघटना लढवण्यात येणार असल्याचे यावेळी सर्वानुमते जाहीर करण्यात आले.
शेतकरी संघटना सातारा जिल्हा बैठक रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कराड येथे पार पडली. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष विकास जाधव, सातारा जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड जिल्हाध्यक्ष विजय पाटील, सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे, शेतकरी संघटना शिक्षक आघाडी शांताराम बाबर, कराड तालुका अध्यक्ष विनायक जाधव, महिला आघाडी अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी शबाना मुल्ला, कराड तालुका महिला संघटक समृद्धी बाबर, कराड तालुका अध्यक्ष महिला आघाडी रोहिता कदम, पाटण तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, तात्यासो पाटील, श्रीकांत भोसले, विद्यार्थीनी आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष प्रतीक्षा पवार आदि प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत आगामी सातारा जिह्यातील 74 जिल्हा परिषदा आणि 148 पंचायत समित्यांच्या निवडणुका शेतकरी संघटना लढवणार आहेत. त्यानुसार जिह्यातील सर्व तालुक्यात जनजागरण दौरा करून शेतकऱयांच्या प्रश्नांवर रान उठवून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका यशस्वी करणार असल्याचे विचार मांडण्यात आले. तसेच महाराष्ट्रात ऊसाला गुजरात प्रमाणे 3500 रुपये प्रति टन दर मिळाला पाहिजे. पण महाराष्ट्रातील कारखानदारच सरकारमध्ये असल्यामुळे शेतकऱयांना प्रति टन 2900 रुपये दरावरच समाधान मानावे लागत आहे. गुजरातमध्ये एस.ए.पी आणि महाराष्ट्रात एफ. आर. पी. मग केंद्रातील व राज्यातील एक देश – एक बाजार, एक देश – एक रेशन कार्ड म्हणणाऱया लोकप्रतिनिधींना हा फरक का दिसत नाही? यामध्ये सरकार धार्जिन्या पाळीव शेतकरी संघटना या शेतकऱयांच्या आर्थिक नुकसानीचे प्रमुख कारण आहेत. जर महाराष्ट्रातील शेतकऱयांना ऊसाला प्रति टन पाच हजार रुपये दर मिळण्यासाठी आडकाठी करणाऱया दोन साखर कारखान्यामधील अंतराची अट निघाली तर प्रति टन पाच हजार रुपये दर मिळू शकतो यासाठी शेतकरी संघटना कायम आग्रही आहे, असेही या बैठकीत चर्चा झाली.