संमेलन चार सत्रात : ग्रंथदिंडी, काव्यरसिकांना मेजवानी : संमेलनाची जय्यत तयारी
वार्ताहर/ कुद्रेमनी
बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थांच्यावतीने आयोजित केलेल्या कुद्रेमनी येथील मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून आज रविवार दि. 15 रोजी साहित्यिक, रसिक, श्रोते, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत साहित्याचा जागर कै. परशराम मि. गुरव साहित्य नगरीत होत आहे. यासाठी सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे.
गेल्या 15-20 दिवसापासून साहित्य संघाचे कार्यकर्ते यंदाचे संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे नियोजन करणे, सभामंडपाची उभरणी, साहित्यिक-पाहुणे मंडळींना निमंत्रण देणे, दुपारी जेवण व्यवस्था, बाजारहाट, पालखी सोहळ्याचे नियोजन, आवश्यक साहित्याची जमवाजमव करणे इ. कामे पूर्णत्वास घेवून संमेलनाची तयारी झाली आहे. चार सत्रात हे संमेलन होणार आहे.
सकाळी 9 वाजता विठ्ठल-रखुमाई मूर्तीचे पूजन मंदिर कमिटी अध्यक्ष परशराम पाटील, प्रकाश गुरव यांच्या हस्ते, पालखी पूजन मारुती काकतकर, ग्रंथपूजन अर्जुन जांबोटकर, मारुती सुतार यांच्या हस्ते होवून ग्रंथदिंडीची सुरुवात होणार आहे. ग्रंथदिंडी सोहळ्यात साहित्यिक, वारकरी मंडळींचा भजनी गजर, लेझीम, झांझपथकातील युवक, शालेय विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व साहित्यप्रेमी आदी सहभागी राहणार आहेत.
वेशीतील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन परशराम श. राजगोळकर, प्रवेशद्वाराचे उद्घाटन जोतिबा बडसकर, कै. परशराम मि. गुरव साहित्य नगरीचे उद्घाटन ईश्वर क. गुरव, ग्रंथदालनाचे उद्घाटन अंकुश धामणेकर, कै. परशराम मि. गुरव स्मारक पूजन मल्लाप्पा निं. पाटील, ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन वाय. बी. चव्हाण, सरस्वती प्रतिमा पूजन मिनाजी प. गुरव, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन अॅड. शाम पाटील, म. जोतिबा फुले प्रतिमा पूजन सचिन दळवी, शिवप्रतिमा पूजन एस. एस. काकतकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन डॉ. जयवंत कट्टीमनी, राजर्षी शाहू महाराज प्रतिमा पूजन डॉ. व्ही. जी. बडसकर, संत तुकाराम महाराज प्रतिमा पूजन प्रशांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर पाहुण्यांच्या उपस्थितीत बेळगाव जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
पहिले सत्र
सकाळी 10 ते 1 या वेळेत पहिल्या सत्राला सुरुवात होणार. यावेळी साहित्य संघाचे अध्यक्ष मारुती पाटील यांच्या प्रास्ताविक भाषणानंतर ग्रा. पं. माजी सदस्य नागेश राजगोळकर हे मान्यवरांचे स्वागत करणार आहेत. यावेळी डॉ. विनोद कांबळे यांचे ‘सीमाप्रदेश : बोली व स्वरुप’ व डॉ. चंद्रकांत पोतदार यांचे ‘अक्षर लिपी’ यावर प्रा. पोतदार व शिवाजी शिंदे ‘ग्रंथभाष्य’ करणार आहेत. यानंतर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे.
दुसरे सत्र-कवी संमेलन
दु. 1 ते 2 या वेळेतील दुसऱ्या सत्रात कवी संमेलन मंगसुळीचे आबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी थळेंद्र लोखंडे (कराड), हर्षदा सुंठणकर (बेळगाव), अमृत पाटील (कुद्रेमनी) हे सहभागी कवी आहेत. दु. 2 ते 2.30 या वेळेत स्नेहभोजन होणार आहे.
प्रबोधनपर व्याख्यान
तिसऱ्या सत्रात दु. 2.30 ते 3.30 या वेळेत गडहिंग्लजचे आत्माराम पाटील यांचे ‘आनंदाने जगुया’ विषयावर प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे. चौथे सत्र दु. 3.30 ते 5 या वेळेत शिराळ्याचे बाबा परीट यांचा कथाकथन कार्यक्रम होणार आहे. सूत्रसंचालन माणिक गोवेकर व डॉ. मधुरा गुरव करणार असून निमंत्रित पाहुणे मंडळी, ग्रा. पं. सदस्य आदी व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.