उद्या सतरावे मराठी साहित्य संमेलन : साहित्यप्रेमी नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
वार्ताहर /किणये
बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीतर्फे रविवार दि. 11 रोजी 17 वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाला महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक, कवी आदींची उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे तालुक्यातील साहित्यप्रेमी नागरिकांनी याचा लाभ होणार आहे. हे संमेलन चार सत्रामध्ये होणार असून या संमेलनाला साहित्यिकांची मांदियाळी लाभणार आहे.
डॉ. यशवंत पाटणे
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साताऱ्याचे डॉ. यशवंत पाटणे राहणार आहेत. यांचा जन्म अमळनेर येथे झाला असून त्यांनी एमएबीएड, एमफिल, पीएचडी केली आहे. त्यांनी वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त वत्ते म्हणून परिचित आहेत. त्यांची अनेक व्याख्याने झाली आहेत. शेकोटी, स्वरगंगेच्या काठी, सुंदर जगण्यासाठी, ग्रंथ आमचे साथी, उद्याच्या आनंदासाठी, जगाच्या कल्याणा, चंदनाचे हात आदी ग्रंथांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, साहित्य जागृती पुरस्कार, ज्ञानेश्वर ज्ञानपीठ कर्वे यांचा समाजप्रबोधन पुरस्कार, अश्वमेध वाचनालय सातारा संस्थेचा अक्षर गौरव असे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
मोहन मोरे
संमेलनाचे उद्घाटक म्हणून कावळेवाडी गावचे सुपुत्र, जि. पं. माजी सदस्य मोहन मोरे राहणार आहेत. समाजामध्ये स्वत:च्या कर्तृत्वाने ते मोठे झाले आहेत. सत्य आणि अहिंसा यांचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालेले आहे. विद्यार्थी जीवनापासून परखड बोलणे, जिद्द व चिकाटीने समुहाचे नेतृत्त्व करणे हे गुण त्यांच्या अंगी आहेत. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. ते या परिसरात एक लोकप्रिय युवा नेतृत्व म्हणून कार्य करतात.
रामचंद्र पाटील
यांचा जन्म बेळगुंदी येथील एका शेतकरी कुटुंबात 1966 साली झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेळगुंदी येथे झाले. उच्च शिक्षण बेळगाव टिळकवाडी येथील आरपीडी महाविद्यालयात डिप्लोमा बँकिंग अँड अकौंटिंगमध्ये पूर्ण केले. चार वर्षे बेळगुंदी ग्लोबल
पॉवर प्रोजेक्ट येथे अकौंटंट म्हणून कार्य केले. त्यानंतर सोलापूर येथे आंचल ऑटोमोबाईल व आंचल फायनान्समध्ये अकौटंट म्हणून वीस वर्षे सेवा बजावली. काजू प्रक्रिया व्यवसाय 2017 साली बेळगुंदी भागात सुरू केला.
प्रा. वैजनाथ महाजन
बेळगुंदी साहित्य संमेलनासाठी प्रा. वैजनाथ महाजन यांचे मोठे योगदान लाभलेले आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन याद्वारे अनेक ज्येष्ठ लेखक व कलावंतांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. अनेक मासिकांचे संपादक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाकडून विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
डॉ. दीपक स्वामी
व्यक्ती आणि वाङ्मय या विषयावर डॉ. दीपक स्वामी यांनी पीएचडी केली आहे. आकाशवाणी सांगली केंद्रावर चिंतन काव्यवाचन व घर हरवते आहे या विषयावर आपले विचार त्यांनी मांडलेले आहेत. द. महाराष्ट्र शिक्षण साहित्य परिषदेचे ते सदस्य आहेत. अनेक संमेलनांमध्ये त्यांनी काव्य वाचन आणि कविता सादर केलेल्या आहेत. त्यांना बीडचा साहित्य गौरव पुरस्कार, वसंत सावंत व छत्रपती शाहू ट्रस्ट सावंतवाडीचा कोकण रात्ररत्न पुरस्कार मिळाला आहे.
दि. बा. पाटील
दि. बा. पाटील यांनी समाजशास्त्र व राज्यशास्त्र विषयात एमए. केले आहे. त्यांच्या वादळ, वेदना, मंतरलेली मनं, होकार, झुंज, मास्तर, घामाचे अश्रू आदी कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. 2004 साली हिरवा चुडा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. भली माणसं या त्यांच्या पुस्तकाला शब्दांगण साहित्य मिरजचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना राष्ट्रसंत जगत्गुरु तुकोबाराय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी अनेक ग्रामीण भागातील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
भीमराव धुळूबुळू
भीमराव धुळूबुळू यांची लेखक आणि कवी म्हणून ख्याती आहे. त्यांचे शिक्षण एमकॉम, एमबीए झाले आहे. राजकारण व रमाई चित्रपटासाठी त्यांनी गीत लेखन केले आहे. अनेक संमेलनांमध्ये त्यांनी कवी संमेलनाचे सूत्रसंचालन म्हणून काम केले आहे. ते दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचे अध्यक्ष आहेत. त्यांना मिरज गौरव पुरस्कार, पत्रकार संघाचा पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.
डॉ. अनिता खेबुडकर
डॉक्टर अनिता खेबुडकर यांनी आपला ठसा साहित्य क्षेत्रात देखील उमटविला आहे. आपली डॉक्टरी प्रॅक्टिस सांभाळत त्या साहित्य क्षेत्रालाही वेळ देतात. लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी व समाज सुदृढ बनावा यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. संजीव न्युरो सर्जिकल सेंटर मिरज येथे एचओडी पदावर त्या कार्यरत आहेत. त्यांचे अनेक लेख विविध अंकांतून प्रकाशित झाले आहेत. त्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद कोल्हापूर व पुणे, अखिल भारतीय महिला साहित्य परिषद दिल्ली या संस्थांच्या सदस्या आहेत.
विसुभाऊ बापट
विसुभाऊ बापट यांनी आपल्या विविध प्रयोगांनी प्रेक्षकांना भुरळ पाडलेली आहे. गेल्या 40 वर्षापासून ते विविध प्रयोग सादर करीत आहेत. त्यांनी असा गाजवा कवी कट्टा या पुस्तकांचे लेखन केलेले आहे. त्यांचे दुबई, कतार, कुवेत, लंडन आधी ठिकाणीही प्रयोग झालेले आहेत. त्यांना अनेक एकपात्री रंगभूमीवरील कार्यक्रमासाठी पुरस्कार मिळालेले आहेत. बेळगुंदी येथे चौथ्या सत्रात कुटुंब रंगलाय काव्यात हा प्रयोग ते सादर करणार आहेत.