उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका पित्याच्या आपल्या पुत्रावरील प्रेमाची ही दुःखद कहाणी आहे. भारत सरकारच्या सेवेत असणारे प्राप्तीकर अधिकारी विमलेश सोनकर यांचे वयाच्या 35 व्या वषी दुःखद निधन झाले होते. रुग्णालयाकडून त्यांना मृत घोषित करण्यात येऊन त्यांचे मृत्यूप्रमाणपत्रही कुटुंबीयांना देण्यात आले होते. तथापि, त्यांचे पिता रामावतार यांचा त्यांचा मृत्यू झाला आहे, यावर विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे मृतदेह घरी आणल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. विमलेश सोनकर हे एकत्र कुटुंबात रहात होते. त्यामुळे त्यांच्या अवतीभवती सदैव नातेवाईकांचा गराडा असे.
त्यांच्या पित्यासह सर्व नातेवाईकांनी त्यांच्या मृतदेहाचे दहन न करण्याचा निर्णय घेतला. मृतदेह घरी आणल्यापासून तब्बल दीड वर्षापर्यंत त्याचे तसेच जतन करण्यात आले. तो खराब होऊ नये यासाठी घरचा एसी चोवीस तास चालू ठेवण्यात येत होता. त्याचप्रमाणे मृतदेहाचे कपडे आणि अंथरुण दररोज बदलण्यात येत होते. मृतदेहाला दिवसातून दोन-तीन वेळा मालिश करण्यात येत असे आणि आंघोळ घालण्यासाठी डेटॉलचा वापर करण्यात येत असे. कधी ना कधी त्यांच्या मृतदेहात पुन्हा प्राण अवतरेल आणि ते जिवंत होऊ शकतील, असा कुटुंबीयांचा दृढ विश्वास होता. मृतदेहाची व्यवस्थित काळजी घेतली गेल्याने दीड वर्षाच्या कालखंडात तो सडला नाही. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना घरात काय चालले आहे? याची कल्पनाही आली नाही. मात्र, काही कारणामुळे प्राप्तीकर विभागातील त्यांचे सहकारी घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. अखेरीस कुटुंबीयांची समजूत काढण्यात आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे मन वळविण्यात विमलेश यांच्या सहकाऱयांना यश आले. एका मृतदेहासमवेत दीड वर्ष वास्तव्य करण्याचा हा प्रकार जगातील पहिलाच असावा, असे बोलले जात आहे.