राहुल गांधी यांची गुजरातमध्ये आश्वासनांची खिरापत, विधानसभा निवडणुकीची तयारी
अहमदाबाद / वृत्तसंस्था
काँगेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी गुजरातच्या जनतेला 500 रुपयांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसचा सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शेतकऱयांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी तसेच विनामूल्य वीज अशीही मोठी आश्वासने दिली आहेत. गुजरातमध्ये यावर्षीच्या डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने ही आश्वासने देण्यात आली आहेत.
राजस्थान, झारखंड व इतर काही राज्यांमध्ये काँगेसची सत्ता आहे. तेथे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत 500 रुपये करण्यात आली आहे का ? तसेच तेथे शेतकऱयांना विनामूल्य वीज आणि कर्जमाफीची स्थिती काय आहे ? अशी खोचक पृच्छा या आश्वासनांवर भाजपकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रतही दोन महिन्यांपूर्वीपर्यंत काँगेसच्या पाठिंब्यावर चालणारे सरकार अडीच वर्षे होते. तेथे त्या काळात गॅस. कर्जमाफी आणि शेतकऱयांची वीज यासंबंधी राहुल गांधी यांनी काय प्रयत्न केले, असाही प्रश्न भाजपने विचारला आहे.
सरदार पटेलांच्या मूल्यांची हत्या
भाजपकडून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूल्यांची हत्या केली जात आहे. सरदार पटेल असते तर शेतकऱयांच्या विरोधात काळे कायदे झाले नसते. पटेल हे शेतकऱयांचा आवाज होते. त्यांचा सर्वात उंच पुतळा भाजपने बनविला आहे. मात्र दुसरीकडे तरुण वर्गाविरोधात भाजपची धोरणे आहेत, अशी टीका त्यांनी केली.
300 युनिट वीज विनामूल्य
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर आपला पक्ष सत्तेवर आल्यास सर्व नागरीकांना प्रत्येक घरी 300 युनिट वीज विनामूल्य दिली जाईल, असे आश्वासनही राहुल गांधींनी दिले. हेच आश्वासन आम आदमी पक्षानेही दिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने जीएसटी व्यवस्था लागू केली. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहक यांचे केवळ नुकसानच झाले आहे, अशीही मल्लीनाथी त्यांनी केली. गुजरात आज केवळ तीन ते चार उद्योगपती चालवत आहेत. ही स्थिती बदलण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.
भाजप-काँगेस अशी लढाई नाही
गुजरातमधील लढाई ही भाजप आणि काँगेसमधील लढाई नाहीच. ती दोन विचारांमधील लढाई आहे. काँगेसची लढाई कोणत्याही पक्षाशी नाही. आम्ही तत्वासाठी मैदानात आहोत. सध्या कोणत्याही स्थितीत भाजप-संघाचे तत्वज्ञान जाणे आवश्यक आहे. तरच काही तरणोपाय आहे, असे विधान त्यांनी केले.
काँगेस-आपमध्ये स्पर्धा
गुजरातमध्ये काँगेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात आश्वासनांची स्पर्धा लागली आहे, असे दिसत आहे. 300 युनिट विनामूल्य वीजेचे आम आदमी पक्षाचे आश्वासन काँगेसनेही उचलले आहे. आता आम आदमी पक्ष आपल्या सूचीत आणखी कोणती आश्वासने जोडतो, ते पहावे लागेल, अशी प्रतिक्रिया काही राजकीय विश्वेषकांनी सोमवारच्या भाषणानंतर व्यक्त केली आहे.