जिल्हयातील 208 कर्मचाऱ्यांना मिळणार 12.5 कोटी : 960 शेतकऱ्यांना 42 कोटींची कर्जमाफी : बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांच्या आनंदोत्सव
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिंदे-फडणवीस सरकारने भुविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम देण्याचा निर्णय गुरुवारच्या कँबिनेटच्या बैठकीत घेतला. या निर्णयानंतर भुविकासच्या कर्मचाऱ्यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव करत दिवाळीपुर्वीच दिवाळी साजरी केली. कर्मचाऱ्यांच्या सात वर्षांच्या लढ्य़ाला अखेर यश मिळाल्याने कर्मचारी, शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारने राज्यातील 27 भूविकास बँका 2015 साली अवसायनात काढल्या. यावेळी कर्मचाऱ्यांची सर्व थकीत रक्कम देणे शासनाने कबूल केले. यासाठी बँकेची मालमत्ता विक्री करुन देणी देण्याचा निर्णय झाला. मात्र यानंतर प्रशासनासह, लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले. राजकारण्यांच्या शिरकावामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण गतिमान करणाऱ्या भूविकास बँकेचे अस्तिव संपुष्टात आले. याचे गंभीर परिणाम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अर्थकारणावर झाले. हक्काचे पैसे थकल्याने जिल्ह्य़ातील 208 कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत भूविकास बँक ज्येष्ठ कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून लढा सुरू केला. अखेर जिद्देने दिलेल्या लढय़ाला पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात यश आले.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतुद केली. मात्र यानंतर लगेचच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या निर्णयांना स्थगिती दिली. यामध्ये भुविकासचे शेतकरी व कर्मचारी यांचा प्रश्न पुन्हा प्रलंबित पडला. नवीन सरकार स्थिरस्थावर झाल्यानंतर स्थगिती दिलेल्या काही निर्णयांवर तातडीने निर्णय घेतले. मात्र यामध्ये भुविका बँकेबाबतचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला. त्यामुळे भुविकास बँक ज्येष्ठ कर्मचारी संघटनेने मागण्यांसाठी पुन्हा पाठपुरावा सुरु केला. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकारने गुरुवारी सकारात्मक निर्णय घेतल्याने त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले.
44 कर्मचाऱ्यांचा मृत्यू
उतारवयातच हक्काच्या पैशांसाठी संघर्ष करावा लागल्याने भूविकासच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना औषधोपचार करणेही मुश्कील झाले होते. पैशाविना उपचार घेणे शक्य नसल्याने काही कर्मचाऱयांची जीवनयात्रा संपली. आत्तापर्यंत 44 कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाला आहे. मात्र आता त्यांच्या वारसदारांना हे पैसे मिळणार आहेत.
बँकेच्या मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतर
भुविकास बँकेचे कर्ज घेतलेले राज्यातील 34 हजार 788 शेतकऱयांना 964.15 कोटीची कर्जमाफी मिळणार आहे. तर बँकेच्या एकूण 60 मालमत्ता असून त्यापैकी 15 मालमत्ता शासनाकडे हस्तांतरीत करण्यात येणार असून उर्वरीत 45 मालमत्तांची लिलाव पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे.
कर्मचारी संघटनेच्या लढ्य़ाला यश
हक्काच्या पैशांसाठी कर्मचाऱयांनी सातत्याने पाठपुरावा केला. आमच्या संघर्षाला आज यश मिळाले. सरकारच्या निर्णयामुळे 44 दिवंगत बांधवांच्या कुटुंबीयांना आणि सध्या आजारी असणाऱया कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळणार आहे.