रेपो दर आता 6.50 टक्के ः रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा व्याजदरवाढ
गृह, वाहनासह व्यक्तिगत कर्ज महागणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. ही वाढ 0.25 टक्के इतकी असून त्यामुळे हा दर आता 6.25 टक्क्यांवरुन 6.50 टक्के करण्यात आला आहे. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेत झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या संचालकांच्या बैठकीत बुधवारी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्जांवरील व्याजदर वाढणार असून कर्जधारकांच्या मासिक परतफेड हप्त्यामध्ये वाढ होणार आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर आता लवकरच विविध बँका कर्जांवरील व्याजदर वाढवून कर्जधारकांना धक्का देऊ शकतात.
मे 2022 पासून रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरांमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. रेपो दरात झालेली ही वाढ मे 2022 पासूनची सलग सहावी वाढ आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ही वाढ आवश्यक होती, असे दास यांनी स्पष्ट केले. कोरोना उद्रेकाच्या काळापूर्वी रेपो दर या पेक्षाही अधिक होता. कोरोना काळात त्यात वाढ करण्यात आली असूनही तो त्या पातळीपर्यंत अद्याप पोहोचला नाही. रिझर्व्ह बँक परिस्थिती पाहून व्याजदरांवर निर्णय घेते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
परिस्थितीत सुधारणा
जागतिक आर्थिक परिस्थिती काही महिन्यांपूर्वी होती, तितकी बिकट आता राहिलेली नाही. भारताचीही अर्थव्यवस्था बळकट असून सध्याचे आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये आर्थिक विकासाचा दर 7 टक्के राहील. पुढच्या वर्षीही तो समाधानकारक पातळीवर असेल. लोकांसमोर महागाईची समस्या असून या आर्थिक वर्षात सरासरी महागाई दर 4 टक्क्यांहून अधिकच असेल. तो 4 टक्क्यांच्या खालच्या पातळीवर राखणे शक्य होणार नाही. बँकेने तिच्या अधिकारात महागाई रोखण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तिचे परिणाम उशिराने दिसून येतात. त्यामुळे काही काळ महागाईचा झोकोळ राहणार आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आर्थिक अस्थिरता
जागतिक स्तरावर परिस्थिती सुधारत असली तरी सध्या ती स्थिर नाही. ती स्थिरस्थावर होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी जावा लागणार आहे. त्यामुळे सध्यातरी रेपो दरात वाढ करणे हाच उपाय करण्याची आवश्यकता आहे. रेपो दरात वाढ केल्याने बाजारातील रोख रकमेचे प्रमाण कमी होऊन मागणी कमी होईल. परिणामी महागाई कमी होणे शक्य आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
मासिक परतफेड वाढणार
रेपो दरात वाढ केल्याने बँका रिझर्व्ह बँकेकडून जी उचल करतात ती महागणार आहे. साहजिकच बँकांना कर्जांवरील व्याजदर वाढवावे लागणार आहेत. याचा परिणाम म्हणून कर्जधारकांना कर्जांच्या परतफेडीसाठी अधिक रक्कम द्यावी लागेल. याचा फटका त्यांना बसेल. मात्र, बँका ठेवींवरील व्याजदरांमध्येही वाढ करण्याची शक्यता आहे. याचा लाभ ठेवीदारांना होणार आहे. इतर बँकांनी त्यांच्या व्याजदरात परिवर्तन केल्यानंतर स्थिती येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. सध्या तरी व्यक्तिगत कर्ज, गृहकर्ज, वाहनकर्ज इत्यादींवर अधिक ईएमआय द्यावा लागणार आहे. तो किती असेल हे विविध बँकांच्या दरांवर ठरणार आहे.
संमिश्र प्रतिक्रिया
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयावर बाजार आणि उद्योगक्षेत्रांमधून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही उद्योजकांनी सततच्या वाढत्या व्याजदरांवर चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी हा निर्णय अपेक्षित होता असे स्पष्ट केले आहे. महागाई नियंत्रणा ठेवण्याला सरकारचे प्राधान्य असणे हे समजण्यासारखे आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने सरकारप्रमाणेच ध्येय राखले असणे प्राप्त परिस्थितीत चुकीचे नाही, अशी प्रतिक्रिया अनेक जणांनी व्यक्त केली.