आधार लिंक करून मिळत नसल्याने उद्योग खात्री योजनेतील संतप्त महिला कामगारांचा पवित्रा
वार्ताहर /कडोली
गेले दोन-तीन महिने झाले तरी आधार लिंक करून मिळत नसल्याने उद्योग खात्री योजनेतील संतप्त महिला कामगारांनी बँक ऑफ इंडियाच्या कडोली येथील शाखा कार्यालयाला टाळे ठोकल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. य् ााबाबत अधिक माहिती अशी की, कडोली ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे 800 हून अधिक खात्री योजनेतील कामगारांचे बँकेच्या नवीन एनपीसीआय अंतर्गत आधार लिंक होणे आवश्यक आहे. सदर आधार लिंक झाले नसल्याने या कामगारांना कामाविना घरी बसावे लागत आहे. या कामगारांनी गेल्या दोन-तीन महिन्यापूर्वी आधार लिंकसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. परंतु बँकेकडून आधार लिंक करण्याचे काम लांबत चालले आहे. बँकेकडे अनेकवेळा चकरा मारुनही कामाला चालना मिळत नाही. त्यामुळे संतप्त कामगारांनी अखेर बँकेला टाळे ठोकले आणि ग्राकूस संघटनेचे पदाधिकारी विश्वेश्वरय्या हिरेमठ आणि संघटेनच्या शेकडो महिला कामगारांनी बँकेसमोर ठिय्या आंदोलन छेडले. य् ाावेळी कडोली ग्रामपंचायतीकडून आधार लिंक कामाबद्दल पंचायतीने पाठपुरावा करावा. कामगारांच्या समस्या तातडीने सोडवून खात्री योजनेंतर्गत लवकर कामे द्यावीत, अशा प्रकारचे लेखी पत्र घेण्यात आले. य् ााप्रसंगी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी काकती पोलीस ठाण्याचे पोलीस चिपलगट्टी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.
लेखी पत्र घेतल्यानंतरच ठिय्या आंदोलन मागे
सदर घटनेची दखल घेऊन ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळी येऊन बँक व्यवस्थापनाशी चर्चा केली. यावेळी बँक मॅनेजर अरुण देव म्हणाले, कडोली येथील बँक ऑफ इंडिया शाखेसाठी कार्यक्षेत्र मोठे आहे. खातेदारही जास्त आहेत. मात्र स्टाफ कमी आहे. तरी सुद्धा आम्ही होईल तेवढा प्रयत्न करून आधार लिंक करण्याचा प्रयत्न करीत आहोत. जवळपास आधार लिंकचे काम पूर्ण करुन वरिष्ठ पातळीवर पाठविले आहे, असे सांगितले. असे सांगूनही कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही. शेवटी कोणत्या तारखेपर्यंत आधार लिंकचे काम पूर्ण होणार याचे लेखी पत्र घेतल्यानंतर कामगारांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.