जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी/ सातारा
देशात जेथे जेथे भाजपाला लोकसभेला पराभव झाला. त्या 144 ठिकाणी भाजपाने विशेष लक्ष घातले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून केंद्रीय मंत्र्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे साताऱयात लोकसभेला कमळ उगवणार आहे. साताऱयाच्या दौऱयावर केंद्रीय वाणीज्य राज्यमंत्री सोम प्रकाशजी तीन दिवस येत आहेत. त्यांच्या दौऱयाची जय्यत तयारी भाजपाच्यावतीने करण्यात आलेली आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार जयकुमार गोरे हे बोलत होते. यावेळी विक्रम पावसकर, माजी आमदार मदन भोसले, अतुल भोसले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार जयकुमार गोरे हे म्हणाले, भाजपाचा जेथे जेथे 2019 च्या निवडणूकीत पराभव झाला. त्या मतदार संघात विजय खेचून आणण्यासाठी एक कार्यक्रम हाती घेतला आहे. असे 144 मतदार संघ देशात आहेत. त्यामध्ये राज्यात 16 मतदार संघ आहेत. तेथे भाजपाच खासदार कसा निवडून येवू शकतो. याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरताच एक शिष्टमंडळ नेमले गेले आहे. केंद्रीय पातळीवरुन केंद्रीय राज्यमंत्र्यांनी त्या मतदार संघात दर तीन महिन्यांनी जावून तीन दिवस मुक्काम करायचा आहे. राज्यातले असे 16 मतदार संघ निवडण्यात आले असून त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री तीन महिन्यातून एकदा तीन दिवस राहून केंद्र शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचल्या का?, संघटनात्मक काम कसे सुरु आहे. बूथ रचना ऍक्टिव्ह आहेत का?, सुदैवाने आता राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार स्पोर्टिव्ह आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यांचा तीन दिवसांचा दौरा आहे. दि. 28 रोजी केंद्रीयमंत्री सोम प्रकाश यांचे सातारा जिह्यात आगमन होणार आहे. शिरवळ येथे त्यांचे जंगी स्वागत भाजपाच्यावतीने करण्यात येणार आहे. तेथून वाई येथे जाणार आहेत. गणपती मंदिरात महागणपतींचे दर्शन घेवून कृष्णामाईची आरती होणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्याशी संवाद साधून पाचवड येथे सरपंच यांची भेट घेणार आहेत. तेथून लिंब येथील बूथ अध्यक्ष आणि लाभार्थ्यांची भेट घेणार आहेत. सातारा येथे लोकसभेच्या कोअर कमिटीची मिटिंग घेवून आढावा घेणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद सभागृहात लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. मेळाव्यानंतर डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी कनिष्क मंगल कार्यालयात बैठक होणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयास भेट देणार आहेत.
दि. 29 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तेथून रहिमतपूर येथे मेळाव्याला हजर राहणार आहेत. तेथे मार्गदर्शन करणार आहेत. उंब्रज येथे सहकारी संस्थांच्या लोकांना मेळाव्यास हजर राहणार आहेत. तेथून सुपने प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देणार आहेत. सुपने येथे कार्यकर्त्याची भेट घेणार आहेत. कराड शहरातील आयोजित महिला मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. आटके येथील कार्यक्रमास हजर राहतील. कराडात मुक्काम होणार असून दुसऱया दिवशी मलकापूर येथे काढण्यात येणाऱया रॅलीत सहभाग होतील आणि पत्रकार परिषदेने त्यांची सांगता होणार आहे, असे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.
कोण म्हणतं सातारा पवारसाहेबांचा बालेकिल्ला
सातारा पवारसाहेबांचा बालेकिल्ला आहे असं कोण म्हणतं. राष्ट्रवादीचे आमदार आहेत किती. तीन आमदार त्यांचे शिवसेनेचे दोन आमदार आणि भाजपाचे दोन आमदार आहेत. शिवसेना आणि भाजपाची सत्ता आहे. हे तुम्हालाही माहिती आणि आम्हालाही माहिती. माझाही मतदार संघ छाती ठोकपणे पवारसाहेबांचा आहे म्हणून सांगत होते. दिले ना मला जनतेने निवडून. बालेकिल्ला वगैरे काही नाही. साताऱयात भाजपाचे कमळ 2024 च्या निवडणूकीत फुलवणार, असाही दावा आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी केला आहे.