Change is the only constant thing या नियमानुसार आम्हाला रोजच नवीन नवीन बदल, नवीन नवीन दिशा शोधण्याचा एक छंदच असतो. आदल्या दिवशीची राहिलेली पोळी आम्ही जशीच्या तशी न खाता ती फोडणीच्या पोळीच्या रूपात जास्त आनंदाने स्वीकारतो. माणसाचं नेमकं तसंच आहे. ज्ञानदेवांनी हीच गोष्ट शंकराच्या मुखातून पार्वतीबद्दल लिहिलेली आहे. अमृत अनुभवामध्ये ते लिहितात की ‘देवी जैसे की रूप तुझे नित्य नूतन देखी जे’ अशा प्रकारे सृष्टीमध्ये रोज प्रत्येक जण नवीन बदलाला सामोरे जाईल. कालचा क्षण पुढच्या क्षणाला राहिलेला नसतो. आपण जे नदीतलं पाणी पिणार असतो ती ओंजळ नदीत बुडवेपर्यंत ते पाणी पुढे निघून गेलेले असते आणि वेगळेच पाणी आपल्या वाट्याला येते. म्हणजेच आम्हाला ते झालेले बदल तसेच स्वीकारावे लागतात. आता साधीच गोष्ट बघाना, आम्ही पूर्वीच्या काळी खलबत्ता वापरत होतो. पाटावरवंटा वापरत होतो पण आता नव्याने मिक्सरच्या रुपात तो बदल आम्ही आनंदाने स्वीकारला. पुन्हा जेव्हा आम्हाला हात दुखायला लागतात, बोटे दुखतात तेव्हा डॉक्टरांकडे गेल्यावर ते साधारण जुन्या काळातल्या या गोष्टींसारखेच व्यायाम आम्हाला देतात. हात खाली वर करा, वगैरे सूचना दिल्या जातात. म्हणजेच आमच्या शरीराचा व्यायाम बंद होतो मग असे बदल स्वीकारतानासुद्धा आम्ही जुन्या गोष्टींची कास धरायला हवी. कपड्यांचे देखील तेच. आम्हाला रोज वेगवेगळ्या फॅशनचे परदेशातले किंवा ब्रँडेड कपडे वापरायला आवडतात परंतु हे बदल स्वीकारत असताना ते आमच्या इथल्या हवेला, वातावरणाला आम्हाला सूट होत आहेत की नाहीत हे आपण बघतच नाही आणि मग आमच्याकडचा नवरदेवदेखील चाळीस डिग्री सेल्सिअस उन्हामध्ये थ्री पीस सूट घालून घोड्यावर मिरवायला निघालेला असतो. ब्रिटीशांचं हे अनुकरण करताना ब्रिटिश लोक मुलांचे कपडे त्यांच्याकडच्या थंड हवेत वापरत असतात. ते भारतामध्ये कधीही योग्य ठरले नव्हते. परंतु ब्रिटिशांचे अंधानुकरण करताना आम्ही हे बदल अगदी जसेच्या तसे स्वीकारले. अशावेळी आम्हीदेखील बदल स्वीकारताना विचार करायला हवा. आजकाल आम्ही बघतोय पैसे, नाणी, नोटा यांचा वापर पूर्वीच्याकाळी जेवढा होता तेवढा न होता, आता तो ऑनलाइन पद्धतीने सुरू झाला आहे आणि काही वर्षातच तो पूर्णपणे प्लास्टिक मनीच्या स्वरूपात येईल. हे सगळे बदल स्वीकारत असताना आम्हालासुद्धा आहे ते नवं तंत्र शिकायला लागलंय. परंतु ह्या पैशाचे हिशेब आम्हाला तोंडी हिशोबातून जास्त योग्य रीतीने करता येतील, याची सवयसुद्धा आम्हाला ठेवायला हवी. फॅशन जरी आम्ही आता एखादी करत असलो तरी ती फॅशन पूर्वी कधीतरी येऊन गेलेली असते आणि मग त्याप्रमाणे आम्हाला उगीच आपण नव्याने हे करतोय की काय असं वाटतं. म्हणजे सृष्टीचा जो क्रम असतो मागून पुढे, पुढून मागे सतत वर्तुळाकार फिरण्याचा तोच खरं म्हणजे आम्ही वापरत असतो. परंतु त्याला बदल असं नाव देतो. हे सगळे बदल आहेत हे बाह्यरंगी आहेत. अंतरंगी बदल करायला मात्र कोणताच माणूस कधीच तयार नसतो. आम्ही परदेशात गेलो तरी तिथे एखादं भारतीय हॉटेल मिळतं का याची चौकशी करत फिरत असतो आणि भारतात असताना मात्र पिझ्झा, पास्ता खात आपण किती सुधारित झालेलो आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या रोजच्या नित्यक्रमामध्ये आम्ही कुठलाही बदल खपवून घेत नाही. हा बदल न करण्याचा दृढसंकल्प म्हाताऱ्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. झोपण्याच्या वेळा, जेवणाच्या वेळा, जेवणामध्ये अमुक्याचे गरम पदार्थ यासाठी आडून बसणारी म्हातारी माणसं स्वत:मध्ये कुठलाही बदल करायला तयार नसतात. आमचे विचार एखाद्याबद्दल जर चुकीचे असतील तर ते आम्ही मरेपर्यंत बदलायला तयार नसतो. अशा अनेक गोष्टी ज्या आमच्या मनाशी निगडित आहेत त्यात बदल न करता आम्ही जर वरवरचे बदल करत असू तर ते योग्य ठरणार नाही. म्हणून बदल करताना बाह्य बदल करण्यापेक्षा मानसिक बदल करणं जास्त योग्य ठरतं.