अध्याय एकविसावा
स्वतःच्या परिपूर्णतेबद्दल सांगताना भगवंत म्हणाले, उद्धवा मी ब्रह्मस्वरूपाने परिपूर्ण असून स्वतः विकाराचे निर्दालन करणारा आहे. इच्छा, द्वेष, सुख, दुःख, इत्यादी विकारांचा कर्ता मीच आणि करून अकर्ताही मीच. मी स्वयंभू ब्रह्मस्वरूप असल्यामुळे मला विकार म्हणून होतच नाहीत. माझी अनंत शक्तीरूप जी योगमाया आहे, तिच्या योगानेच मी चिन्मूर्ती असतानाही उत्पत्ती, स्थिती व संहार करतो.
माझ्या निजस्वरूपात भेदाची वार्ताच असत नाही. भ्रमाने ज्याप्रमाणे दोरावर सर्पाचा भास होतो, परंतु दोराचा सर्प कधीच होत नाही, त्याप्रमाणे मी परमात्मा अविकारीच असतो. घोषरूपाने असणारा जो अत्यंत सूक्ष्म नाद तो मी प्रणवरूपाने प्रत्येक प्राणिमात्राच्या ठिकाणी स्वतःसिद्धच आहे परंतु लोक सकामबुद्धीमुळे हे जाणत नाहीत. मी निजानंदस्वरूपी प्रत्येकाच्या हृदयातच राहात असताना, भ्रांतिष्ट लोक कामासक्तीने लोलिंगत होऊन नीचांचे उंबरठे झिजवीत असतात. योगी लोक मात्र त्या हृदयस्थ देवाचे ध्यान करीत असतात, त्याचा त्यांना निदिध्यास लागलेला असतो. प्राणापान सम करून ते निरंतर नादाचे अनुसंधान ठेवतात. माझे वेदरहस्य जे गुप्त आहे, ते प्रणवरूपाने हृदयाच्या आतच आहे. हा अत्यंत सूक्ष्म नाद नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत असतो.
अशा प्रकारच्या नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत ओंकाररूपाने चालणारा सूक्ष्म नादरूपी तंतु, महायोगी योगधारणेने अनुसंधानांत राखतात. हाच नाद लोकात दोन्ही कानांवर दोन हात ठेवले म्हणजे घुमघुमत असलेला ऐकू येतो. योगी लोक ह्याला ‘अनाहतशब्द’ म्हणतात. वेदांती लोक ह्यालाच ‘सूक्ष्मनाद’ असे म्हणतात व आम्ही ह्याला ‘शुद्ध वेद’ असे म्हणतो.
अशा स्वतःसिद्ध वेदावर मनुष्याची श्रद्धा बसत नाही म्हणून तो सूक्ष्मवेदच मी लोककल्याणाकरिता स्थूलरूपात आणला. हा जो स्थूलरूपाने प्रगट झाला. तोच दृष्टांताने तुला अगदी स्पष्ट करून सांगतो ऐक असे श्रीकृष्ण बोलले. त्यामुळे उद्धवाच्या आत्म्याला मोठा संतोष झाला. त्याच्या मनात विचार आला की, श्रीकृष्ण माझ्यासाठी फारच सुरस निरूपण करताहेत. त्यांचे माझ्यावर फार प्रेम असल्यामुळे केवळ माझा उद्धार करण्याकरिताच श्रीकृष्ण निरूपणाचा सुकाळ करून त्यात अमृताहूनही गोड रस भरत आहेत.
उद्धव असा विचार करत असतानाच भगवंत पुढे समजाऊन सांगू लागले ते म्हणाले, कोळीकीटक हृदयात उत्पन्न होणारे तंतू आपल्या तोंडातून बाहेर काढतो, त्याप्रमाणे अमृतमय, वेदमय प्रभू प्राणाच्या उपाधीने नादवान होऊन, मनाला निमित्त करून हृदयाकाशातून ॐकारापासून हजारो प्रकारची वैखरी वाणी प्रगट करतो. तिचा पार लागणे कठीण आहे. तोच प्रभू ती वाणी प्रलयकाली स्वतःमध्ये विलीन करून घेतो.
ज्याप्रमाणे कोळी त्याच्या तोंडांतून अतिशय बारीक असे तंतु काढतो, त्याप्रमाणेच निर्गुणामधून ओंकाराचा धागा निघतो. ओंकार सचेतन झाला की, त्याला वेदात ‘हिरण्यगर्भ’ असे म्हणतात. उद्धवा! तोच ‘प्रभु’ म्हणजे ऐश्वर्ययुक्त स्वामी होय. त्याची शक्ती अचिंत्य, अनंत आहे. तोच छंदोमय वेदमूर्ती होय. तो वस्तुतः अविनाशी असून नित्य सुखमय व सुखमूर्तीच आहे. तो प्राणोपाधी घेऊन नादरूपाने मनःशक्तीला जागृत करतो. ही जी जागृत केलेली मनःशक्ती असते, तीच स्पर्श-स्वर-वर्ण यांना निर्माण करते. हिलाच वेदवेत्ते पुरुष ‘बृहती’ असे म्हणतात. कारण हिचा विस्तार अपरिमित आहे. ते स्वरांनी व वर्णांनीयुक्त असलेले मंत्र, हृदयाकाशामध्ये विलक्षण रीतीने हजारो शाखांनी विस्तार पावतात. याप्रमाणे वैखरी वाणीचा विस्तार अपरंपार वाढला
आहे.
स्वर आणि वर्ण इत्यादिकांच्या उच्चाराने वेदांना अधि÷ान असणारी वैखरी वाणी कशी उत्पन्न झाली, तेही सांगतो ऐक. अ-उ-म या तीन मात्रा एकत्र झाल्या म्हणजे लोक त्याला ‘ओंकार’ म्हणतात. हा ओंकार अलौकिक असून अत्यंत सूक्ष्म रूपाने देहातच असतो. त्याच ओंकाराला प्राणाच्या संगतीने मूलाधारादी चक्रामध्ये ऊर्ध्वगती सुरू होते.