ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमादरम्यान रखडलेली पोलीस भरती झालीच पाहिजे, ही मागणी करत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने फडणवीस नांदेडमध्ये आले होते. मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमानंतर फडणवीस यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याचा आढावा घेणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी फडणवीस बाहेर येताक्षणी काही विद्यार्थ्यांनी पाच वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती झालीच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करत फडणवीसांना घेराव घातला.
दरम्यान, फडणवीस विद्यार्थ्यांना भेटले. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, पण काहीही न बोलताच ते तिथून निघून गेले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याने पोलिसांना विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला.